ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) हे पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वाढत्या वयोमानाप्रमाणे अनेक शारीरिक व्याधी असूनही शरद पवार राज्यभरात पायाला भिंगरी लावून फिरताना दिसतात. शरद पवार जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा विषयाला धरून आपल्या खास गावरान शैलीत मिश्किल टिप्पणी करण्यात किंवा विरोधकांना शालूतून जोडे हाणण्याच्या बाबतीत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. पुरंदरमध्ये (Purandar) आज त्याची प्रचिती आली. तिथं एका शेतकऱ्याच्या वक्तव्याच्या अनुषंगानं बोलताना शरद पवारांनी उच्चारलेल्या एका वाक्यानं अवघी सभा जिंकून घेतली. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
शरद पवार आज जिल्ह्यातल्या पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका शेतकऱ्यांनी शरद पवार यांना विनंती केली. ‘साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका’, असे शेतकऱ्याने म्हटले होते. त्यावर पवारांनी मजेशीर उत्तर दिली. शरद पवार म्हणाले की, कोण म्हणतं मी म्हातारा झालोय. काय पाहिलं तुम्ही? असा प्रश्नही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाही तर पवारही आपल्याच या बोलण्यावर मनमुराद हसले.
तसेच या कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत. १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.