महाविकासआघाडीकडून मैदानात कोण उतरणार : काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
संजय गायकवाड/सांगली
लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections)अजून काहीसा अवकाश असला तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सारेच पक्ष झाडून कामाला लागले आहेत. एका बाजूला भाजपाने राज्यात 45 प्लसचे टार्गेट ठेवले असतानाच दुसरीकडे महाविकासआघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीनेही (NCP) लोकसभेला राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून कोल्हापूरची जागा काँग्रेसला (Congress) देवून त्याबदल्यात राष्ट्रवादीकडून सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे जाणार की पुन्हा येथे काँग्रेसच शड्डू ठोकणार याकडे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्याच्या राजकारणात ठाकरे सरकार पायउतार होवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यामुळे विशेषतः भारतीय जनता पार्टीचा (BJP) आत्मविश्वास चांगलीच बळावला आहे. आगामी काही महिन्यात होवू घातलेल्या मुंबईसह 13 महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा शिंदे गट, मनसे तसेच महाविकासआघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण केंद्रातील भाजपाच्या दृष्टीने विचार केला तर भाजपाला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांची फौज असलेल्या राष्ट्रवादीलाही आगामी लोकसभेच्या निवडणूकीत चमकदार कामगिरी करायची आहे. लोकसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार दिसले पाहिजेत, यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांपासून ते राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)आदी सारी मंडळी झाडून कामाला लागली आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंतराव पाटील यांनी तर मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. विरोधी पक्षात असले तरी राष्ट्रवादी हा कायमच चर्चेत राहिलेला पक्ष आहे.
हे ही वाचा : मुंबईतील प्रदूषणावर जुही चावलाचे ट्वीट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सेलिब्रिटींनी…’
पश्चिम महाराष्ट्र तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिह्यातील साखर कारखानदारी, दूध संस्था, सूत गिरण्या यासह बहुतांश सहकारी संस्थावर राष्ट्रवादीचे प्राबाल्य आहे. यापुढील काळात विधानसभा असो वा लोकसभा असो राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवायची आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. येणाऱया निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकासआघाडी म्हणून लढणार की स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी प्रत्येक जागा महत्वाची हे गृहित धरून विशेषतः राष्ट्रवादीकडून सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली या लोकसभेच्या जागेचा विचार केला तर सांगली हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख होती. येथून प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील या दादा घराण्यातील दिग्गजांनी विजय मिळविला. पण, मोदी लाटेत भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. गेल्यावेळी हा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला होता. बदलत्या राजकीय समीकरणात त्यावेळी स्वाभिमानीकडून काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील हे मैदानात उतरले होते. पक्ष आणि चिन्ह नवीन असतानाही विशाल पाटील यांनी तिरंगी लढतीत क्रमांक दोनची लक्षणीय मते घेतली होती.
कोल्हापूरच्या बदली सांगली
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीमध्ये महाराष्ट्रातील काही जागांची अदलाबदली शक्य असून राष्ट्रवादीकडे असलेली कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन त्याबदल्यात सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला जाऊ शकतो. अर्थातच राजकारणात जर तर काही अर्थ नसतो. पण, लोकसभेला जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी कामाला लागलेल्या राष्ट्रवादीच्या दिशेकडे दुर्लक्षित करता येणार नाही.
काँग्रेस काय करणार?
दरम्यान, सांगली लोकसभेची जागा काँग्रेसची असून ती काँग्रेसकडेच राहणार हे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी काही दिवसापूर्वीच जाहीर केले आहे. त्याशिवाय गेल्यावेळी लोकसभा लढविलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे.