राज्यात राजकीय उलथापालथी झाल्या आणि अनपेक्षितपणे राज्य सरकारमध्ये बदल झाले. नवे मुख्यमंत्री आले त्याचबरोबर नवे मंत्रीमंडळ कार्यरत झाले. भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर सत्तेत सहभागी झाले असून मंत्रिमंडळात विविध ठिकाणचे प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
गोवा राज्य म्हटले म्हणजे जणू सुंदर सोबित राज्य. पायाभूत साधनसुविधा विकसित करण्याच्यादृष्टीने या राज्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. पर्यटन क्षेत्रातही जगाच्या क्रमांकावर नावलौकिक कमावला आहे. सध्या राज्यात श्रावण मासानिमित्त विविध मंदिरांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. भजन, कीर्तन तसेच धार्मिक विधींनी नटलेल्या या गोव्यात सध्या एकीकडे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण असताना दुसरीकडे गुन्हेगारी तसेच अपघातांची मालिका सुरूच असून हे रोखणार तरी कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
गोवा राज्य समुद्रकिनाऱयांबरोबरच विलोभनीय मंदिर, चर्चेस, मशिदी यासाठी विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आपली संस्कृती, उत्सव आणि एकूणच सौंदर्यात्मक गुणांसाठी वाखाणण्याजोगे असलेले राज्य आता वाढते अपघात तसेच गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. सध्या गोव्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. मद्यपान करून वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, खड्डय़ांचे साम्राज्य, घाईघाईने ओव्हरटेकिंग ज्यामुळे अपघात किंवा अपघात घडणे अशा सर्वांचे आपले राज्य जणू साक्षीदार आहे. कामानिमित्त घरातून वाहन घेऊन बाहेर पडलेला कुटुंबाचा घटक सुरक्षितपणे घरात पोहोचेल, याची शाश्वती देता येत नाही.
वाहतूक नियमांचे उल्लंघन, अतिवेग, मद्यसेवनामुळे येणारा थकवा आणि वाहनांसह रस्त्यावरून जाताना निष्काळजीपणा ही या अपघातांची काही प्रमुख कारणे आहेत. सध्या गोव्यात विक्रमी पाऊस कोसळल्याने साहजिकच रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. निर्माण झालेले खड्डेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱया गुरांमुळेही अपघात घडण्याचे प्रकार घडलेले आहेत. गुरांसंबंधी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात गेल्या रविवारी दयानंदनगर-धारबांदोडा येथे कंटेनर आणि स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला. दक्षिण गोव्यातील झुआरी नदीत वाहन कोसळल्याने चार व्यक्ती मृत्यूच्या जबडय़ात गुदमरल्याच्या आपत्तीने राज्य हादरले होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील अपघातांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, गोव्यातील रस्त्यांवरील 95 टक्के रस्ते अपघात, विशेषतः रात्रीच्यावेळी दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होतात. त्यांनी सध्याच्या कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून, मद्यपान करून वाहन चालविण्याला आळा घालण्यासाठी कठोर दंड आकारून कठोर रस्ते नियम लागू करण्याच्या गरजेवर जोर दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, रात्रीच्यावेळी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱयांविरोधात कारवाईसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. शहरात व शहराबाहेर जाणाऱया काही मुख्य नाक्मयांवर पोलिसांतर्फे ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा तळीरामांनी मात्र धसका घेतला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱयांवर गुन्हा नोंद करण्यात येतो. रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून सर्व वाहनांमधील चालकांची अल्कोमीटरद्वारे तपासणी केली जाते. रात्रीच्यावेळी मद्यप्राशन करून फिरणाऱया तळीरामांनी याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे नाका चुकवत विविध आडमार्गाने जाणे तळीराम पसंत करीत असून पोलिसांच्या हातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात ते असतात, असेही चित्र आहे.
अलीकडे रात्रीच्यावेळी झालेल्या अनेक अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच सदर अपघात हे अती मद्यप्राशन केल्याने झाल्याचे निदर्शनास आले. रात्रीच्यावेळी वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे तसेच अतिमद्यप्राशन करून अपघात घडू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यातील रस्त्यांवर ही ‘ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’ विरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतून लोकांना त्रास देण्याचा सरकारचा किंवा पोलिसांचा इरादा नसून रात्रीच्यावेळी होणाऱया अपघातांचे प्रमाण नियंत्रणात यावे आणि लोकांचे नाहक जाणारे जीव वाचावे, या एकच हेतू आहे. या मोहिमेस लोकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वाहने चुकीच्या दिशेने तसेच बेफिकीरपणे हाकून सुरक्षितपणे वाहन चालविणाऱयांनाही धडक देऊन त्यांच्याही अपघातास काहीजण कारणीभूत ठरलेले आहेत. खांडेपार गावातील एका घरात कार घुसल्याची घटनाही घडलेली आहे. तसेच वेगवेगळय़ा अपघातात एक दाम्पत्य तसेच काही ठिकाणी युवकही बळी पडलेले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी काय करता येईल, याचे विचारमंथन होणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच मोबाईल तसेच अन्य गोष्टींकडे नजर न वळविता आपले डोळे फक्त रस्त्यावर ठेवून जबाबदारीने वाहन चालविणे आवश्यक ठरते.
रस्त्यांची स्थिती पाहिली तर सरकारी अधिकाऱयांची उदासीनता लक्षात येईल. गोव्यातील रस्त्यांचे रुपांतर खड्डय़ांमध्ये झाले आहे. आपल्या राज्यातील बहुतांश रस्त्यांवर पथदीप नाहीत तर अनेक ठिकाणी फलकही गहाळ आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने लावले आहेत. कोणत्याही कामासाठी अचानक खोदलेल्या रस्त्यांवर रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे हे रस्ते वाहनचालकांसाठी, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक बनतात. पावसाळय़ात तर हे खड्डे पाण्याने तुडुंब भरल्याने परिस्थिती आणखीनच बिकट असते व अशा परिस्थितीत दुचाकी वाहने अपघातास बळी पडतात. अचानक लावलेल्या सूचना फलक आणि उड्डाणपुलांमुळेही रस्त्यावर अपघात होतात. प्रशासकीय यंत्रणा किती सदोष आहे, याचे प्रमुख उदाहरण म्हणजे अटल सेतूची अवस्था. या अटल सेतूचीही अवस्था बिकट बनली आहे. या पुलावरही झालेल्या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा बळी गेला आहे. राज्यात दरवर्षी रस्त्यांचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढलेला आहे. गोव्यातील रस्ते पूर्वी चांगले होते. त्यामुळे राज्यात पर्यटक यायचे. आता रस्ते खराब झाले आहेत, असे अगदी स्पष्टपणे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले आहे. वाढते वाहन अपघात व खराब रस्ते याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो.
राजेश परब