अध्याय एकोणीसावा
भक्त आणि भक्ती हे भगवंतांचे अत्यंत आवडते विषय होत. त्याबद्दल उद्धवाशी बोलताना ते म्हणाले, अरे, भक्त म्हणजे माझ्या बोलत्या चालत्या मूर्तीच आहेत. त्यांची यथासांग पूजा केली की, मला संतोष होतो. जसा मद्भाव माझ्या भक्तांच्या ठिकाणी ठेवशील, तसा सर्व भुतांच्या बाबतीत ठेव कारण भूताकृती जरी निरनिराळी असल्या, तरी त्या सर्वांमध्ये आत्मस्थिती एकच असते.
निखारे पाहिले असता एक लांबट, एक वाकडा, एक वाटोळा, असे निरनिराळय़ा आकाराचे दिसतात पण अग्नि मात्र एकच असतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र मत्स्वरूपच आहेत. भिंतीवरच्या चित्रांमध्ये पाहू गेले तर निरनिराळय़ा आकृती दिसतात पण त्यामध्ये भिंत जशी एकच असते, त्याप्रमाणे मी चिदात्मा सर्व प्राणिमात्रात भरलेला आहे हेच निजभावाने निश्चित समजावे. दुजेपणाचा अहंकार सोडून देऊन सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना धरणे ही माझी सर्वात श्रे÷ पूजा होय अशा रीतीने जो माझी पूजा करतो, तो मला अत्यंत आवडता होतो. मी सर्वांगाने त्याच्या घरी राबतो कारण तो माझा स्वामी असतो. त्याची जी जी कांही कृती असते, ते ते माझे भजनच होते. मला सोडून अणुमात्रही दुसरे कांही करावयाचे त्याला कळत नाही. त्याच्या साऱया इंद्रियांच्या कर्मात माझी भक्ती आपोआप उत्पन्न होते. माझ्या नामाशिवाय किंवा गुणानुवादाशिवाय त्याच्या वाणीला अन्य काही ठाऊकच नसते. त्याच्या मनाला जे जे कांही आवडते, ते ते तो मलाच अर्पण करतो. आणि शेवटी त्याचे मन तो मलाच वाहून टाकतो. आता, मन माझ्या स्वरूपामध्ये कसे अर्पण होते ते ऐक. तो धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करतो. यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असे सर्व काही तो माझ्यासाठीच करतो. ईश्वर हाच आपला खरा स्वार्थ आहे, असा निश्चय ठेवून, निजपरमार्थ साधण्याकरिता धनधान्यादि सर्वस्व खर्च करतो. परमार्थ पूर्णपणे साध्य करण्याकरिता पोटामध्ये खरे खरे वैराग्य पाहिजे असते. म्हणून मला भेटण्यासाठी साऱया सुखोपभोगाचा त्याग करतो. छत्र, चामरे, हत्ती, घोडे इत्यादि सारे वैभव सोडून देऊन खंक होतो. माझ्यापर्यंत येऊन पोचावयाचे असेल, तर असेच कडकडीत वैराग्य पाहिजे. सर्व सुखोपभोगाच्या वस्तूंचा त्याग करायचा ही गोष्ट मोठी कठीण आहे असा बहुतेकांचा समज असतो. ज्याला माझ्या प्राप्तीतील गोडी कळलेली नसते त्याला ते निश्चितच कठीण वाटते पण ज्याला माझ्या प्राप्तीतील गोडी कळलेली असते. त्याला सुखोपभोगाच्या गोष्टीत काहीच गम्य नसते. त्यामुळे तो त्याचा सहजी त्याग करू शकतो. आणि त्यात त्याला आपण काही विशेष केलंय असंही वाटत नाही कारण तो त्याचा स्वभाव बनतो. माझे निजसुख प्राप्त करून घेण्यासाठी बायकामुले व धनधान्य इत्यादि चट सारे टाकून देतो. इतका त्याला अनुताप होतो. आवडीने माझे भजन करू लागले म्हणजे भोगाची आठवणच तो विसरतो. खरा भक्त माझ्या प्राप्तीसाठी क्षणही वाया जाऊ देत नाही. माझ्या प्राप्तीच्याच उद्देशाने श्रौत स्मार्त कर्मे करतो. अग्निहोत्र, यज्ञयाग, मोठमोठाली व्रते व नेम सारे माझ्यासाठीच तो करत असतो. माझे चिद्रूप प्राप्त होण्याकरिताच गायत्री आदिकरून मंत्रांचा जप करतो. दुर्धर तप आचरण करतो तेही मत्स्वरूपाची प्राप्ती होण्याकरताच. मी विश्व्Rभर सर्वव्यापी व सर्वतोमुखी असल्यामुळे तो गोरगरिबांच्या मुखी अन्नदान करितो, तेणेकरून मी सुखी होत असतो. हृदयात मी स्वतःसिद्धच असतो, माझे आवाहन करून तो भोजन करतो व तेही मलाच अर्पण करितो. प्रत्येक घासाघासाला हरीचे स्मरण केले म्हणजे ते अन्नच पूर्ण ब्रह्म होते. अशा रीतीने माझे भक्त आपण होऊनच आपले सारे कर्म मला अर्पण करतात. उद्धवा अशा रीतीने सदासर्वदा जे लोक या धर्मांचे पालन करून मला समर्पित होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो मग त्याला आणखी काही मिळायचे शिल्लकच रहात नाही.
क्रमशः