अध्याय बाविसावा
भगवंत उद्धवाला प्रकृती आणि पुरुष यातील फरक समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, उद्धवा प्रकृती मायारुप असल्याने नाश पावणारी आहे. देह हा प्रकृतीपासून तयार होत असल्याने तोही नाश पावणारा आहे पण त्यातील पुरुषरूपी चैतन्य मात्र अविनाशी असते. थोडक्मयात हा देह नाशवंत आहे हे नक्की परंतु त्यातील मनाला सतत काही ना काही इच्छा होत असतात आणि अंत्यसमयी त्या इच्छांचं गाठोडं बरोबर घेऊन मन आत्म्यासहवर्तमान त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अनुकूल असलेल्या देहात प्रवेश करत असतं. वास्तविक पाहता विद्वान मंडळींना ही सर्व जाणीव असते. तरीही ते संसार खरा मानून त्यात गुंतून पडतात.
उद्धवाला हे सर्व समजलं पण त्याचबरोबर त्याच्या मनात येणारा आणखी एक प्रश्न भगवंतांनी स्वतःच बोलून दाखवला. ते म्हणाले, आता असं वाटेल की, हा संसार जरी समोर दिसत असला तरी मिथ्या आहे असं मान्य केलं तर मग पूजा अर्चा, यज्ञयाग, होमहवन, नामस्मरण आदि साधने हवीतच कशाला? भगवंतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भगवंत स्वतःच उत्तर देत आहेत.
ते म्हणाले, उद्ध्वा! बागुलबुवाचे भय पाहू गेले तर खोटेच असते पण मुलाला ते खरेच वाटत असते. त्याप्रमाणे खोटय़ा संसाराच्या खोटय़ा संकटानेच जीव घाबरा होतो. लोकांना विषय फार प्रिय असतात आणि ते मिळाले नाहीत किंवा आहे यात काही कमी झालं तर कसं, या कल्पनेने ते कासावीस होतात. त्यांना निरंतर विषयाचेच ध्यान असते, देहाभिमानाने त्यांचे मन सदासर्वदा विषयातच गुंग असते. अशा मंडळींना वस्तुस्थितीची जाणीव व्हावी, आपण विषयात गुंतून पडलो आहोत हे लक्षात यावे आणि काही एक उपरती होऊन विषयासक्ती नाहीशी होऊन, ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होण्यासाठी साधने सांगितलेली आहेत. श्रवण व मनन केले नाही, विचाराने ज्ञान साधले नाही, किंवा परिपूर्ण वैराग्य धरले नाही तर संसाराचे भय तुटत नाही. संसार हा मिथ्या आहे असे फक्त तोंडानेच म्हटल्याने काही सुखदुःखांचे भय तुटत नाही किंवा जन्ममरणांचा फेरा व अहंममता काही सुटत नाहीत. त्यासाठी अज्ञानी मंडळींनी, अवश्य साधना करावी. विवेकाने परिपूर्ण वैराग्य धारण केले म्हणजे संसारबंधन नष्ट होते. सर्व साधनांचे मूळ वैराग्य प्राप्तीत आहे ते प्राप्त झाले की, ब्रह्मज्ञान हाती लागते. म्हणून आग जशी धडाडते, त्याप्रमाणे अंगांत वैराग्य बाणले म्हणजे. म्हणजे ब्रम्प्राप्तीचा अधिकार प्राप्त होतो. असे जे कोणी पूर्ण मुमुक्षु असतात व ज्यांना सद्गुरु पूर्ण कृपेने थापटून जागे करतात त्यांना देहादिकांच्या अभेद भावाने पुष्टी येते, मायेच्या गुणांची त्रिपुटी मिथ्या भासते, त्यांना होणाऱया ब्रह्मानंदाने सृष्टी भरून जाते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीला संसार केवळ स्वप्नवत् भासू लागतो. एवढा अप्रतिम लाभ वैराग्यविवेकाने हाती लागतो. उद्धवा, विषयाची आसक्तीच परमार्थप्राप्तीला बाधक होते. ह्याकरिता खरोखर विषयच सोडून दे आणि पुन्हा त्यांना हातही लावू नकोस. वृत्ती आसक्त झाली म्हणजे ती इंद्रियांना चिकटून बसते आणि तिला अत्यंत लुब्ध झाल्याने विषयाचे भोग भोगावेसे वाटतात. हाच संसाराचा मोठा रोग होय. ह्याकरिता त्याचा त्याग करावा. उत्तम पक्वान्न असले आणि त्यात विष घातलेले असले, तर त्याचा एक घास खाल्ला तरी प्राण जातो. म्हणजे विषाने एकदाच प्राण जातो पण विषय हे पुन्हा पुन्हा जीव घेत असतात.
त्यावर उद्धवाने शंका विचारली की, प्रारब्धानुसार भोग येत असतात, मग त्यांचा त्याग कसा घडेल? आणि विषयत्यागाचा उपाय सापडून वैराग्य कसे प्राप्त होईल? यावर भगवंत म्हणाले, प्रारब्धानेच विषयभोग येतात आणि तेच साधकाला दुःख देतात. वणव्यात सापडलेली हरणे जशी होरपळतात, त्याप्रमाणेच साधकही दुःखात होरपळून निघतात. वाघाच्या तोंडात गाय सापडल्याप्रमाणे तो विषय भोगणारा जेव्हा चरफडतो, तेव्हा त्या अनुतापाने अनिवार वैराग्य उत्पन्न होते.
खरे खरे वैराग्य उत्पन्न झाले की, सद्गुरूची कृपा हाती लागते आणि गुरुकृपेच्या प्रभावानेच द्वंद्वासहवर्तमान सारा संसार नाहीसा होतो.
क्रमशः