पुणे / प्रतिनिधी :
शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार कोण असावा, हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाचाच आहे. मुळात राजे हे काही शिवसेनेत नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट का द्यावे, असा सवाल परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी शुक्रवारी येथे केला.
पुणे शहरामध्ये 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पुणे शहराच्या शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख असून, त्यांनी पुणे शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जाधव म्हणाले, राजेंनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावे आणि तेही अपक्ष, हे अजून कळत नाही. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडे जागा मागावी. तुम्ही 6 वर्ष भाजपचे खासदार होतात. असे असताना आत्ता शिवसेनेने तुम्हाला तिकीट द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही करता, हे चुकीचे आहे. तरीही शिवसेनेने तुम्हाला शिवबंधन बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तुम्ही तसे केले नाहि. एकतर पक्षाचा स्वीकार करायचा नाही आणि परत म्हणायचे आम्हाला दिले नाही, शब्द पाळला नाही. असे म्हणण्याला अर्थ नाही, अशी टीका जाधव यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या निकषाप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार आहे, त्यांना 60 टक्के आणि बाकीच्यांना 20-20 टक्के सत्तेचा वाटा देणे अपेक्षित आहे. पण शिवसेनेला विकासकामांच्या निधीचा वाटा मिळत नसल्याची खंत शिवसैनिकांनी बोलून दाखविल्याचे जाधव यांनी या वेळी नमूद केले.