डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालाचा भीतीदायक निष्कर्ष
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
1970 पासून आतापर्यंत जगभरातून दोन-तृतीयांश वन्यजीवांची संख्या संपुष्टात आली आहे. म्हणजेच 69 टक्के वन्यजीव पृथ्वी आणि समुद्र दोन्ही ठिकाणाहून गायब झाले आहेत. हा भीतीदायक निष्कर्ष वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार या मोठय़ा आणि दुर्दैवी बदलामागे हवामान बदल, जंगलतोड आणि प्रदूषण ही तीन मोठी कारणे आहेत. दर मिनिटाला 27 फुटबॉल मैदानांइतके जंगल नष्ट होत आहे. तर समुद्रातूनही निम्मी कोरल रीफ्स संपली आहे.
माणसांमुळेच हवामान बदल घडून आहे. प्रदूषण वाढल्याने वन्यजीवांवर संकट ओढवले आहे. प्राणी आणि वृक्ष-रोपांच्या लाखो प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीवांच्या संख्येत 69 टक्क्यांची घट होणे धोकादायक आहे. आम्ही आमचे जग दररोज हळूहळू नष्ट करत चाललो आहोत असे उद्गार झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनमध्ये कॉन्झर्व्हेशन अँड पॉलिसीचे संचालक ऍन्ड्रय़ू टेरी यांनी काढले आहेत.
वन्यजीवांच्या संख्येत सर्वाधिक घसरण दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये दिसून आली आहे. मागील 5 दशकांमध्ये तेथील एकूण वन्यजीवांच्या संख्येत 94 टक्क्यांची घट नोंद झाली आहे. ब्राझीलच्या अमेझॉनमध्ये आढळून येणाऱया पिंक रिव्हर डॉल्फिनच्या संख्येत 1994-2016 दरम्यान 65 टक्क्यांची घट झाली आहे. वन्यजीवांच्या संख्येत दरवर्षी 2.5 टक्क्यांची घट होत असल्याचे टेरी यांनी म्हटले आहे.
निसर्ग पूर्वी देखील सहन करत होता आणि आताही सहन करत आहे. निसर्गाने माणसांशी लढणे सोडून दिले आहे. परंतु याचे परिणाम अत्यंत धोकादायक असतील. काही ठिकाणी आशादायक चित्र असून तेथे वन्यजीवांसंबंधी प्रभावी कार्य केले जात असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफ-युकेचे संचालक मार्क राइट यांनी म्हटले आहे.
आमची जंगले वाढते तापमान आणि प्रदूषण नियंत्रित करतात. परंतु जंगलतोड वाढत असल्याने प्रदूषणामुळे तापमानात भर पडत आहे. अशा स्थितीत सर्व जंगले संपुष्टात येतील आणि पृथ्वीचे तापमान त्वरित 0.5 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. दरवर्षी आम्ही पोर्तुगालच्या आकाराइतके वनक्षेत्र गमावत आहेत. यामुळे कार्बन उत्सर्जन वाढून दुष्काळाचे संकट ओढवते, पूर आणि मृदाप्रदूषणामुळे वन्यजीवांसह माणूसही धोक्यात येत असल्याचे मार्क यांनी नमूद केले आहे.