वार्ताहर/सांबरा
बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे वेळेवर येत नसलेल्या कामचुकार अंगणवाडी शिक्षिकांना ग्रामपंचायत सदस्यांनी रंगेहात पकडले व सदर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे आता कामचुकार अंगणवाडी शिक्षिकांवर कोणती कारवाई करणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.गावातील माऊती गल्लीनजीकच्या लक्ष्मी कट्टा येथे चार अंगणवाडी केंद्रे आहेत. या चार अंगणवाडी केंद्रामध्ये चार चार शिक्षिकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र दररोज अंगणवाडी शिक्षिका वेळेवर येत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तसेच गर्भवती महिलांना व लहान मुलांना देण्यात येणारे धान्य व आहार ही कमी प्रमाणात देण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. सकाळी दहा ते दोन या वेळेत अंगणवाडी केंद्र सुरू असतात. मात्र दररोज दुपारी बारा वाजले तरी अंगणवाडी शिक्षिकांचा पत्ता नसायचा.
दररोज मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे पालकांनी याबाबत ग्रामपंचायत सदस्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी गावातील ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौगुले, सागर शेरेकर, दिलीप कोंडसकोप, प्रशांत कल्लाणाचे, ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी चौगुले व गीता कोलकार यांनी दुपारी बारा वाजता अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता चारीही शिक्षिका उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने सदस्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामचुकार अंगणवाडी शिक्षिकांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून गुऊवारी अंगणवाडी केंद्रांना भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन सदस्यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे ग्रामस्थांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.