ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रश्मी शुक्लांना अडचणीत आणणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणाचा आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधातील खंडणीच्या गुन्ह्याचा तपास आता CBI कडे वर्ग करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीरपणे राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने शुक्ला यांना दोषी ठरवले होते. बेकायदेशीरपणे शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्यमंत्री बच्चू कडू, एकनाथ खडसे, आशिष देशमुख, संजय काकडे, नाना पटोले यांच्यासह काही नेत्यांचे फोन बोगस नावाने टॅप केले होते. बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुणे आणि मुंबईत गुन्हा दाखल असून, त्याची चौकशी सुरू आहे.
तर जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवणे, तसेच मारहाण करीत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यासह इतर 28 जणांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. शुक्ला आणि महाजन ही दोन्ही प्रकरणं CBI कडे वर्ग करण्यात आली असून, कागदोपत्री पूर्तता होणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : …तर सत्तेत सहभागी होण्याचा विचार करू, अमित ठाकरेंचं मोठं विधान