सोनिया गांधींसह गांधी परिवारातील तीन सदस्य आणि काँग्रेसचे सगळे खासदार महागाई विरोधात नवी दिल्लीत रस्त्यावर उतरले. देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आठ वर्षांपूर्वी ‘महंगाई डायन खाये जात है’ या फिल्मी गाण्याला आंदोलनाचे स्वरूप देत भाजपने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या विरोधात दंड थोपटत दिल्लीचा आपला रस्ता प्रशस्त केला होता. 5 ऑगस्ट या भाजपने ऐतिहासिक बनवलेल्या तारखेला, काँग्रेसने महागाई विरोधात राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाकडे कुच करत आंदोलन छेडले. देशात महागाईने कळस गाठलेला आहे. सत्ताधारी मंत्र्यांना ही महागाई दिसत नसली तरी ती प्रत्यक्षात सर्वसामान्यांचा खिसा कुरतडत आहे. मंत्र्यांना जरी, हा प्रश्न जगात आहे मग, भारतातच खळखळ का? असे सत्तेच्या आराम खुर्चीत बसून वाटत असले, तरी जगाला धान्य पुरवणारा देश, स्वतः मात्र महाग वस्तू खरेदी करून जगतोय. हे वास्तव नाकारता येत नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन काँग्रेसने आंदोलन छेडले तर त्याचे जनतेकडून स्वागत झाले पाहिजे. तसे ते होईल का? हा प्रश्न विचारण्याचे कारण काँग्रेस संघटनेतच आहे. आठ वर्षांपूर्वी स्मृती इराणी आणि इतर भाजप नेते महागाई वरून सरकारला खूप दोष देत होते. ते योग्यही होते. नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक कठोर शब्द त्यावेळी सर्वसामान्य जनतेला आपले वाटत होते. मात्र तेव्हा सत्तेवर असताना काँग्रेसला ज्या जनतेच्या प्रश्नाचा विसर पडला होता त्याच जनतेच्या प्रश्नाचा विसर आज भाजपला पडला आहे. तेव्हाचा भाजपचा कळवळा घेऊन आज काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. हा खुर्चीचाच महिमा असावा की, तेव्हा काँग्रेस आम्ही सर्वसामान्यांना 100 दिवस पुरेल इतका रोजगार देतोय आणि अन्नसुरक्षा कायद्याद्वारे प्रत्येकाला अन्न देण्याचे कर्तव्य पार पाडतोय असे सांगत होती. आज भाजपकडून 80 कोटी लोकांना आम्ही अन्न पुरवतोय आणि रोजगार योजनेत कुठे कमी दिले नाही हेच उत्तर येतेय! तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाला सिमेंटचे मजबूत घर, त्या घरात एलईडी बल्ब, स्वयंपाकाचा गॅस पासून सर्व काही दिले जाईल असे सांगायचे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत आपण हे स्वप्न पूर्ण करू, असेही शब्द द्यायचे. आज काँग्रेस त्या स्वप्नांची आठवण करून देत आहे, तर पोलीस त्यांचा रस्ता रोखत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भूमिका बदलल्यानंतर त्यांचे विचारही बदलतात की काय? असा प्रश्न कोणालाही पडावा, इतका हा नजरेत भरणारा बदल आहे. दहा वर्षे सलग सत्ता असल्याचा तेव्हा काँग्रेसला असलेला अहंकार आणि देशात विरोधक शिल्लक राहणार नाहीत हा आज भाजपला असलेला अहंकार या सगळय़ाच्या मागे आहे. सर्वसामान्य माणसांना दिलेले शब्द केवळ विरोधात असताना नेत्यांना कसे आठवतात आणि सत्तेवर आल्यावर त्यांचा विसर कसा पडतो? याचे चिंतन देशाला करावे लागेल इतका हा बदल विचार करण्यासारखा आहे. अर्थात आपल्याच प्रश्नात अडकून पडलेल्या जनतेला विचार करण्याची संधी मिळेल अशी सध्याची स्थिती नाही. एका मागून एक प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभे असताना, त्याला त्यातून सुटका कशी मिळेल याचा विचार करायचा असतो. त्याचे उत्तर राजकीय मार्गाने द्यायचे, हा विचार त्याच्या मनात पक्का करायचा असेल तर त्यासाठी खूप मेहनत राजकीय पक्षांना घ्यावी लागते. 2012 ते 2014 या काळात भाजपने तशी कठोर मेहनत घेतली. जिथे आपली शक्ती कमी पडेल तिथे सामाजिक संस्था आणि समाजसेवकांची शक्ती त्यांनी वापरात आणली. त्यांच्या आंदोलन करण्याच्या प्रेरणेला हवा देऊन मैदानात आणून बसवले आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उंच करून त्या संधीचे सोने केले. आज काँग्रेस जेव्हा स्वतःच्या सर्वोच्च नेत्यांसह आंदोलनात उतरले आहे तेव्हा ती एकाकी आहे. शनिवारी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मतदान करण्याबाबत ममता बॅनर्जी फेरविचार करतील असा काँग्रेसला अजूनही आशावाद वाटतो. मात्र चार दिवस दिल्लीत मुक्कामाला असणाऱया ममता मतदानाची वेळ आली तरी आपले पत्ते खोलत नाहीत! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समोर आहे. काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्य युद्धाचा गोड शेवट झाला, असा वारसा या गांधींची काँग्रेसही सांगत आली आहे. मात्र ‘हर घर तिरंगा’चे कॅम्पेन सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे. देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांची कुटुंबे काँग्रेसशी जोडलेली होती, आजही आहेत. मात्र अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किमान या स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जाऊन काँग्रेसच्यावतीने त्या परिवारांचे आभार मानावेत आणि स्वातंत्र्यसैनिकाच्या तसबिरीला एक फुलांचा हार घालावा, असा भारतभरातील एकाही जिह्यातल्या काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम ठरला नाही. की, कोणते अभियान राबले नाही. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले, हे देशाला माहित आहे, या अविर्भावात जर काँग्रेस आजही राहत असेल तर ते जनतेपर्यंत पोहोचणार कधी? संतापाचा उपयोग सरकार विरोधातील असंतोषात करणार कधी? सर्वसामान्य जनता पेटून उठायची असेल तर काँग्रेसचे संघटन त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि असलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सातत्याने काही कार्यक्रम दिला पाहिजे. तरच ते कार्यकर्ते जनतेतील असंतोषाला एका संवैधानिक विरोधात परावर्तित करू शकतील. केवळ एका आंदोलनाने काँग्रेस, सरकार विरोधातील वातावरण निर्माण करू शकेल, अशी स्थिती नाही. तोंडावर 9 आणि 15 ऑगस्ट आहे. सरकार त्याचा उपयोग स्वतःविषयी वातावरण निर्माण करण्यात करत आहे, मात्र काँग्रेस त्याचा वापर सरकारी धोरणा विरोधात ‘असंतोष हीच देशभक्ती’ अशा पद्धतीने करण्यात पुरेसा यशस्वी ठरत नाही. हे काँग्रेसचे दुर्दैव आहे. प्रादेशिक शक्तींशी जुळवून घेत जोपर्यंत ते असा देशव्यापी कार्यक्रम सातत्याने राबवणार नाहीत, तोपर्यंत जनतेचा आवाज आणि काँग्रेसचा आब राखला जाणार नाही. त्यांनी रणशिंग फुंकले याचे स्वागत, मात्र त्यात जीव ओतला पाहिजे ही अपेक्षा!
Previous Articleब्रिटनची रॅडुकानू शेवटच्या आठ खेळाडूत
Next Article रत्नागिरीत वरूणराजाचे पुनरागमन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.