ज्येष्ठ नेते शरद पवारांवर तेथे जाण्याची वेळ येणार नाही
प्रतिनिधी/ मुंबई
गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नी दावे- प्रतिदावे सुरू असताना मंगळवारी दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रातून आलेल्या ट्रकसह पाच वाहनांवर दगडफेक केल्याचे वृत्त पसरल्यानंतर तीव्र पडसाद उमटले. सीमावर्ती भागातून दोन्ही राज्यांनी बस वाहतूक बंद केली. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्माई यांच्याशी चर्चा करत या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकने हल्ले न थांबवल्यास बेळगावला धडक देण्याचा इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बोम्माई यांच्याशी संपर्क साधून शांतता व समन्वय राखण्याबाबत आवाहन केले आहे.
शहांना देणार संपूर्ण माहिती
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी संपूर्ण स्थिती पेंद्रीय गफहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. मंगळवारी बेळगावमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी आपण दूरध्वनीवर लगेचच चर्चा केली आणि या घटनांबद्दल त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांसंदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आणि अशा घटना घडविणाऱयांना सरकार पाठीशी घालणार नाही, असे सांगून त्यांनी मला आश्वस्त केले आहे. संपूर्ण घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
राज्याराज्यात तणाव होणे अयोग्य
फडणवीस म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाने कुणालाही, कुठल्याही राज्यात प्रवास करण्याचा, निवासाचा आणि नोकरीचा अधिकार प्रदान केला आहे. असे करण्यापासून कुणीही, कुणालाही रोखू शकत नाही. राज्याराज्यात अशाप्रकारचे वातावरण तयार होणे योग्य नाही. विशेषतः सर्वोच्च न्यायालयात विषय प्रलंबित असताना अशा घटना घडूच नयेत. स्थिती बिघडविणे हे दोन्ही राज्यांच्या हिताचे नाही. एखादे राज्य ऐकतच नसेल तर हा विषय पेंद्राकडे न्यावा लागेल. म्हणूनच केंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा संपूर्ण विषय मांडणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीमाप्रश्नी पवारांची नेहमीच चांगली भूमिका
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आधी बैठक घेत या प्रश्नात लक्ष घातले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा आमंत्रित केले होते. कदाचित प्रकृतीमुळे ते येऊ शकले नसावेत. त्यांनी सीमाप्रश्नी नेहमीच चांगली भूमिका घेतली आहे. परंतु 48 तासांत पवारांवर तेथे जाण्याची वेळ येणार नाही.
कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठिशी आम्ही सारे आणि सरकार म्हणूनसुद्धा ठामपणे आहोत, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोणीही कायदा हाती घेऊ नये
महाराष्ट्र कायम न्यायाच्या तत्त्वावर चालणारे राज्य आहे. न्यायप्रियतेसाठी संपूर्ण देशात ओळखले जाते आणि ती आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच महाराष्ट्रात कुणीही कायदा हाती घेऊ नये, ही सर्वांना विनंती असल्याचेही फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा बोम्माईंना निषेधाचा फोन
फडणवीस म्हणाले, कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या पाच ते सहा वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावातील या हिंसाचाराच्या घटनेचा आपण बोम्माई यांना फोन करुन तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे बोम्माई यांनी आपल्याला सांगितले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांना संरक्षण देणार असल्याचेही बोम्माई यांनी आपल्याला सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
हल्ले न थांबल्यास कर्नाटकावर धडक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इशारा
महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासात न थांबल्यास कर्नाटकात धडक देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कर्नाटक आणि पेंद्रातल्या मोदी सरकारला दिला आहे. बेळगावातील घटनेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची राहिली. परंतु संयमालाही मर्यादा असतात. बोम्माईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता पेंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडे बोल त्यांनी मोदी सरकारला सुनावले.
कर्नाटकच्या भाषेवर भूमिका घेण्याची गरज
पवार म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. बोम्माईंचे सीमावादावर भाष्य असो की, जतच्या ग्रामस्थांना केलेले आवाहन असो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर केलेल्या भाषेवर आता भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून येणारे कॉल चिंता करायला लावणारे आहेत. समितीच्या कार्यालयासमोर पोलीस तैनात आहेत. समितीला निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. बेळगावात मराठी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, असे पवार म्हणाले.
म. ए. समितीकडून बोलावणे
‘तुम्ही कुणीतरी आम्हाला येऊन धीर द्यावा’, असे पत्र एकीकरण समितीचे आहे. या भागातील लोकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची तयारी आणि इच्छा आहे. कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांना फडणवीसांनी केलेला कॉल उपयोगाचा झाला नाही, असे शरद पवार म्हणाले. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातून जाणाऱया वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत, तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे, पण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. त्यांच्या सहकाऱयांकडून हल्ले होत असतील तर देशाच्या ऐक्याला फार मोठा धक्का आहे. हेच काम जर कर्नाटकातून होत असेल तर पेंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असेही पवार यांनी सुनावले.
शिंदे-बोम्माई यांच्यात चर्चा
मुंबई ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच चिघळला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यात हस्तक्षेप करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा करून दोन्ही बाजूंनी शांतता राखण्याचे आवाहन केले असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.