केंद्रीय सहकार खाते निर्णय घेणार असल्याची चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जिल्हा बँका (तोटय़ात असलेल्या) राज्य बँकेत विलीन करण्याबाबत निर्णय केंद्रातील सहकार खात्याकडून घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय सहकार विभागाकडून एक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या अहवालावर जिल्हा बँकांचे भवितव्य ठरणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये केंद्रीय सहकार विभागाकडून जिल्हा बँकांसंबंधी अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
सद्यकाळात अनेक जिल्हा बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या बँकांना राज्य बँकेत विलीन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. मागील 10 वर्षांमध्ये अनेकदा जिल्हा बँकांना राज्य बँकेत विलीन करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला सहकार क्षेत्रातील संस्था तसेच नेत्यांचा विरोध आहे. जिल्हा बँका तोटय़ात असल्याने त्यांना राज्य बँकेत विलीन करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार विभागाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.