राहुल गांधी यांची माहिती ः नागरी समाज संघटनांशी साधला संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ूशन क्लब ऑफ इंडियामध्ये ‘भारत जोडो यात्रे’निमित्त नागरी समाज संघटना आणि प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत जोडो अभियान आपल्यासाटी ‘तपश्चर्ये’सारखे असून भारताला एकसंघ करण्यासाठी दीर्घ लढा देण्याची तयारी दर्शवली. या अभियानाला 7 सप्टेंबर रोजी प्रारंभ केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी बैठकीत नागरी समाजाचे प्रतिनिधी, लेखक आणि विचारवंतांसह अनेक प्रतिनिधींशी ‘भारत जोडो यात्रे’वर चर्चा केली. राहुल गांधी यांच्यासमवेत येथे झालेल्या बैठकीत ‘स्वराज इंडिया’चे योगेंद्र यादव, नियोजन आयोगाच्या माजी सदस्य सय्यदा हमीद, ‘एकता परिषदे’चे पी. व्ही. राजगोपाल, सफाई कर्मचारी आंदोलनाचे बेजवाडा विल्सन आणि विविध सामाजिक आणि गैरसरकारी संघटनांचे सुमारे दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते.
या यात्रेचा उद्देश राहुल गांधी यांनी सामाजिक संघटनांसमोर विषद केला. या अभियानात माझ्यासोबत कोणीही आले नाही तरी मी एकटाच सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. देशाला एकत्र आणण्यासाठी हा मोठा लढा आहे. मी या लढय़ासाठी तयार आहे. याशिवाय भारताच्या राजकारणाचे ध्रुवीकरण झाल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची विचारधारा आहे. भारतातील जनतेला फुटीचे राजकारण नको, एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे, असा संदेश आम्ही या अभियानाच्या माध्यमातून देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
भारत जोडो अभियानाचे स्वागत ः योगेंद्र यादव
आम्ही काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करत असून ही काळाची गरज असल्याचे ‘स्वराज इंडिया’चे योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर सांगितले. या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आम्ही मान्य केले आहे. आमच्या प्रत्येकाच्या विचारधारा भिन्न असल्या तरी आम्ही या प्रवासात सहभागी होण्याचे मान्य केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
आज लोगो, टॅगलाईनचे अनावरण
काँग्रेस पक्षाच्यावतीने मंगळवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ‘भारत जोडो यात्रे’साठी लोगो, टॅगलाईन आणि वेबसाईट लॉन्च करण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होणार आहे. 500 किमी लांब आणि 150 दिवसांच्या ‘नॉन स्टॉप’ पदयात्रेत देशभरातील 12 राज्यांचा समावेश असणार आहे. या अभियानापूर्वी काँग्रेस पक्ष 4 सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईच्या मुद्यावर ‘हल्ला बोल-दिल्ली चलो’ रॅली काढण्याची तयारी करत आहे.