महान फलंदाज सुनील गावसकर यांचा प्रस्ताव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रदीर्घ कालावधीपासून बॅड पॅचशी झगडत असलेल्या विराट कोहलीला विशेषतः आऊटसाईड ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळताना समस्या जाणवत आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी विराटशी 20 मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली तर मी निश्चितपणाने मार्ग काढून देऊ शकतो, असे स्पष्ट प्रतिपादन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी केले. विराटला नोव्हेंबर 2019 नंतर कोणत्याही क्रिकेट प्रकारात अगदी एकही शतक झळकावता आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर 73 वर्षीय गावसकर बोलत होते.
33 वर्षीय विराट सातत्याने खराब फॉर्ममध्ये राहिला असून इंग्लिश भूमीतील पाचवी कसोटी, 2 वनडे व 2 टी-20 सामन्यातील 6 डावात त्याला अवघ्या 76 धावा जमवता आल्या. साहजिकच, सर्व स्तरावरुन टीका होत असताना त्याच्यावरील दडपणही वाढत चालले आहे.
‘मला विराटशी फक्त 20 मिनिटे संवादाची संधी मिळायला हवी. असे झाले तर मी निश्चितपणाने त्याला खराब फॉर्ममधून बाहेर आणण्यासाठी मदत करु शकतो. तो यानंतर सत्वर धावांची आतषबाजी सुरु करेल, असे मला म्हणायचे नाही. पण, ऑफस्टम्प लाईनवर खेळताना त्याला झगडावे लागते आहे, ते निश्चितपणाने थांबेल’, असे गावसकर पुढे म्हणाले.
विराट कोहली सातत्याने खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला अगदी आगामी टी-20 वर्ल्डकपमधून वगळले जावे, अशीही टोकाची मागणी होत आली आहे. अगदी कपिलदेवनेही त्याला वगळण्याची गरज जाहीरपणे बोलून दाखवली. पण, बाबर आझम, केविन पीटरसन, शोएब अख्तर यांच्यासारख्या काही आजी-माजी खेळाडूंनी विराटच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले.
‘विराटसाठी सध्या पहिली चूक ही शेवटची चूक ठरत आहे. त्यातच धावा होत नसल्याने उतावळेपणाने प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा त्याला फटका बसत आहे. अशा चुका टाळण्यासाठी मी विराटला काही बाबी सुचवू शकतो. रिषभ पंतने आपल्या मागील सर्व चुकांमधून धडे आत्मसात केले, याचा त्याला सध्या लाभ होत आहे. यापूर्वी तो ऑफस्टम्पबाहेरील चेंडूंचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात बाद होत असे. पण, आता त्याने आपल्या खेळात उत्तम बदल केले आहेत’, असे गावसकर याप्रसंगी म्हणाले.
विराटचे बालपणीचे प्रशिक्षक म्हणतात, विराटने अकादमीत परत यावे!
विराटच्या फॉर्ममध्ये मला काहीच अडचण जाणवत नाही. तो ज्या चेंडूंवर बाद झाला, ते बरेच सर्वोत्तम, न खेळता येण्यासारखे चेंडू होते. पण, याव्यतिरिक्त ज्या समस्या आहेत, त्यावर मार्ग काढता येऊ शकतो आणि यासाठी त्याने त्याच्या स्वतःच्या हक्काच्या अकादमीत थोडा वेळ परत यावे, असे विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे. विराटला पाचव्या व शेवटच्या कसोटीत अनुक्रमे 11 व 20 अशा धावांवर, दोन टी-20 सामन्यात केवळ 12 धावांवर आणि त्यानंतर 2 वनडे सामन्यात 17 व 16 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले. त्या पार्श्वभूमीवर राजकुमार शर्मा बोलत होते.