आमदार जीत आरोलकर यांचे आश्वासन
मोरजी : पेडणे तालुका हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या शेतात जर व्यवस्थीत पाणी पोहोचले तर विविध प्रकारची शेती करून शेतकरी मळे फुलवू शकतात. सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली प्रत्येक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. आमदार या नात्याने आपण शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिले. मांद्रे सावंतवाडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात मिरची लागवड व इतर शेती उत्पन्न सुरू आह त्याची पाहणी करून आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी आमदार आरोलकर बोलत होते. मांद्रे सावंतवाडा शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरच्यांची लागवड करतात. शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणी ज्या दोन विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढून विहिरींची साफसफाई करत असतानाच त्यांना शेतीसाठी आवश्यक ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एका विहिरीवरील जो पंप मोडलेला आहे, त्या ठिकाणी नवीन पंप बसवून शेतकऱ्यांना पाणी देण्याची योजना राबवली जाणार, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. मांद्रे सावंतवाडा येथील जे शेतकरी शेतीवरच आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. जलसिंचन खात्याकडून विहिरीतील गाळ उपसून घेऊन तसेच नवीन पंप बसवून दिला जाईल. जर जलसिंचन खात्याच्या विभागाने तातडीने काम हाती घेतले नाही तर आपण स्वखर्चाने हे काम करून देईन अशी ग्वाही आमदार आरोलकर यांनी शेतकऱ्यांना दिली.