विजय सरदेसाई यांचा सवाल
प्रतिनिधी /मडगाव
म्हादई प्रश्नावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटक सरकारच्या डीपीआर प्रस्तावाला दिलेली मंजुरी मागे घेण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असे म्हटले आहे. जर मुख्यमंत्री सावंत यांची ही विनंती पंतप्रधानांनी मान्य केली नाही, तर ते मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील काय, असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. म्हादईचा सौदा करण्यासाठीच सावंत यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती, असा गंभीर आरोप त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
म्हादई प्रश्नाबद्दल प्रमोद सावंत कधीही गंभीर नव्हते. हा प्रश्न योग्यरीत्या धसास लावण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांनी नवी दिल्ली येथील गोवा निवासच्या पहिल्या मजल्यावर एक परिपूर्ण असे कार्यालय सुरू केले होते. सावंत यांनी हे कार्यालय बंद केले. या कार्यालयात एका साहाय्यक अभियंत्याची आणि एका कनिष्ठ अभियंत्याची कायमस्वरूपी नियुक्ती केली होती. त्यांनाही नंतर हटविण्यात आले, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या हितरक्षणासाठी प्रयत्न नाहीत
म्हादईचा मुद्दा प्रमोद सावंत सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडलाच नाही. तसेच गोव्याचे हितरक्षण करण्यासाठीं राजकीयदृष्टय़ाही दिल्लीत प्रयत्न केले नाहीत, असा दावा सरदेसाई यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप श्रेष्ठींनी सावंत यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यावेळी कर्नाटक राज्याच्या नेत्यांसमोर त्यांना कळसा-भांडुरा प्रकल्पाचा कर्नाटक राज्याच्या प्रस्ताव मान्य केला जाईल याची स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. हवे असल्यास गोव्याने सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान द्यावे असे त्यांना सांगण्यात आले होते. या बैठकीत सावंत एकही शब्द बोलले नाहीत, असा आरोप सरदेसाई यांनी याप्रसंगी केला.
गोव्याच्या वकिलांना हटविले
स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनीं पूर्वीचे एजी आत्माराम नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या ज्येष्ठ वकिलांची तुकडी नेमली होती. पण सावंत हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गोव्यातील वकिलांना या कामातून हटवून दिल्लीच्या वकिलांची नेमणूक केली. याच दिल्लीच्या वकिलांनी हा तंटा सोडविण्यासाठी म्हादई लवाद नेमण्यास गोव्याची हरकत नाही असे निवेदन सर्वोच्च न्यायालयात केले. खरे तर हा निर्णय म्हादईच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरला, असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.