कोल्हापूर/बाळासाहेब उबाळे
कोरोनाचा संसर्ग पूर्ण संपला आहे. निर्बंध पूर्ण शिथिल होऊनही एक्स्प्रेस रेल्वेची साधारण तिकिटे अद्याप बंदच आहेत. यामुळे रोजच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गामुळे २०२० व २०२१ मध्ये संपूर्ण जगावर परिणाम झाला.सर्व व्यवहार ठप्प झाले. विमान, रेल्वेसह सर्वच वाहतूक सेवा थांबली होती. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर रेल्वे सेवा हळू-हळू रुळावर येऊ लागली. सुरुवातीला काही ठराविक मार्गावर ठराविक रेल्वे सुरु करण्यात आल्या. पण त्यासाठी अनेक निर्बंध होते. यामुळे रेल्वेचा प्रवास दिव्य बनले होते. कोल्हापूर-मिरज, सांगली, सातारा आणि पुणे मार्गावर पॅसेंजर सेवा एप्रिल महिन्यात सुरु झाली. यामुळे नेहमीच्या रेल्वे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला. पण पॅसेंजरशिवाय एक्स्प्रेस रेल्वेतून साधारण तिकिटावर प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वेच्या पुणे विभागात धावणाऱया एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करायचा असेल तर अजूनही साधारण तिकिट मिळत नाही. त्यासाठी एक दिवस आगाऊ आरक्षण करावे लागते. काही कारणास्तव पॅसेंजर रेल्वे चुकल्यास प्रवाशांना दुसऱया पॅसेंजरच्या प्रतीक्षेत दिवस घालवण्याची वेळ येते. कारण एक्स्प्रेस गाडीसाठी आगाऊ आरक्षण करावे लागते. पॅसेंजर रेल्वे चुकल्यास बहुतांश प्रवासी पुढील पॅसेंजर रेल्वे येण्याची वाट न पहाता एसटी किंवा खासगी वाहनाकडे वळतात. पण यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक नुकसानही होत आहे.
लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?
रेल्वेच प्रवास सर्वांसाठी परवडणारा आणि सोयीचा आहे. यामुळे कोल्हापुरातून यापूर्वी सुरु असणाऱया सर्व रेल्वे सुरु होण्याची गरज आहे. एक्स्प्रेस रेल्वेसाठी अद्याप साधारण तिकिटे मिळत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना ऐनवेळी या गाडीतून प्रवास करता येत नाही. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोल्हापूरातून सुटणाऱया एक्स्प्रेस रेल्वे
कोल्हापूर -मुंबई (कोयना एक्स्प्रेस, दररोज)
कोल्हापूर -धनबाद (शुक्रवार) दिक्षाभूमी एक्स्प्रेस
कोल्हापूर-निजामुद्दीन (मंगळवार)
कोल्हापूर-तिरुपती (दररोज)
कोल्हापूर-नागपूर (सोमवार व शुक्रवारी)
कोल्हापूर -अहमदाबाद (शनिवारी)
कोल्हापूर-गोंदिया (दररोज) महाराष्ट्र एक्स्प्रेस
कोल्हापूर-सातारा पॅसेंजर विशेष (दररोज)
कोल्हापूर-मुंबई (दररोज) महालक्ष्मी एक्स्प्रेस
२९ जूनपासून एक्स्प्रेसमध्ये साधारण तिकिट उपलब्ध होईल
कोविड काळात रेल्वे प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर आगाऊ आरक्षण करावे लागत होते. त्यावेळी अनेक प्रवाशांनी पुढील तारखेचे आरक्षण केले आहे. २८ जूनपर्यंत आरक्षित तिकिटे संपण्याची शक्यता आहे. यामुळे २९ जूनपासून एक्स्प्रेस गाडीमध्ये ऐनवेळीही साधारण तिकिट मिळण्यास सुरुवात होईल.
मनोज झँवर, रेल्वे जनसंपर्क अधिकारी