सप्टेंबरअखेर संपणार मुदत ः लाभार्थ्यांचे मुदतवाढीकडे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही महिन्यांपासून अन्नभाग्य योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. या मोफत धान्याची मुदत सप्टेंबरअखेर संपणार आहे. त्यामुळे या मोफत धान्याची मुदत वाढविणार की मोफत धान्य बंद करणार? याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
दारिद्रय़ रेषेखालील गोरगरिबांचे धान्याविना हाल होऊ नयेत, यासाठी कोरोना काळात केंद्र सरकारने अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला होता आणि या मोफत धान्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे माणसी 10 किलो तांदूळ लाभार्थ्यांना मिळत आहेत. यामध्ये 5 किलो तांदूळ केंद्र सरकार तर 5 किलो तांदूळ राज्य सरकारकडून उपलब्ध होत आहेत. मागील दोन वर्षांपासून अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक याचा लाभ घेत आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारचा धान्य पुरवठा बंद होणार की मुदत वाढविणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
कोरोनाच्या संसर्गानंतर 2020 पासून केंद्र सरकारकडून मोफत धान्यांचा पुरवठा केला जातो. त्याचा विस्तार वाढविण्यात आला असून सप्टेंबरपर्यंत हा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार मोफत धान्यांची मुदत वाढविणार की थांबविणार? याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अतिरिक्त धान्यांचा कोरोना काळात लाभार्थ्यांना मोठा आधार झाला होता. सर्वत्र व्यवहार, बाजारपेठ आणि इतर उद्योगधंदे थांबले होते. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेला शासनाचा मोफत रेशनपुरवठा आधार ठरला होता. या मोफत रेशनपुरवठय़ाची मुदत सप्टेंबरपर्यंत आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त मोफत धान्यांचा पुरवठा बंद केल्यास पुढील महिन्यापासून केवळ राज्य सरकारकडून धान्यांचे वितरण होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 10 किलो ऐवजी 5 किलो तांदळावर समाधान मानावे लागणार आहे.