बहुतांशी केंदे बंद, पेयजल योजना कुचकामी
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी पेयजल योजनेंतर्गत गावोगावी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र बहुतांशी जलशुद्धीकरण केंदे बंदच असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा देखील झाला आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दिवसेंदिवस पारा वाढत चालला आहे. वाढत्या उष्मामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणीच नसल्याने नागरिकांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळय़ात गावोगावी जलशुद्धीकरण केंदे असून देखील नागरिकांना मात्र पाण्यासाठी विहिरी, कूपनलिका आणि तलावावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे संबंधीत खात्याच्या अधिकाऱयांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून जलशुद्धीकरण केंदे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली होती. मात्र सर्रास जलशुद्धीकरण केंदेही पाण्याविना धूळखात पडली आहेत. दरम्यान या जलशुद्धीकरण केंद्रावर ‘स्वच्छ पाणी प्या, निरोगी राहा’ असा आशय लिहिला आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना शुद्ध पाणी तर सोडाच, साधे पाणीही मिळणेही मुश्कील झाले आहे.
पेयजल योजनेंतर्गत गावोगावी उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी लाखो रुपये खर्ची घातले गेले आहेत. एक रुपये देवून 10 लीटर पाणी देणे हा या योजनेचा उद्देश होता. मात्र जलशुद्धीकरण केंद्रातच पाणी नसल्याने शुद्ध पाणी कोठून मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढती लोकसंख्या आणि जमिनीतील कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे अनेक गावात पाणी समस्या गंभीर बनत आहे. अशावेळी पेयजल योजना महत्त्वपूर्ण ठरली असती. मात्र सर्रास जलशुद्धीकरण केंदे बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र अवलंबून रहावे लागते.