ऍडलेड/ वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची पाच सामन्यांची हॉकी कसोटी मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला.
टॉप सिडेड ऑस्ट्रेलियाने रविवारच्या शेवटच्या सामन्यात भारताच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. भारताने या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. कर्णधार हरमनप्रित सिंगचे पेनल्टी कॉर्नरवरील 2 गोल अखेर वाया गेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे टॉम विकहॅमने 2 ऱया आणि 17 व्या मिनिटाला, झेलिव्हेस्किने 30 व्या मिनिटाला, अँडरसनने 40 व्या मिनिटाला तर जॅक व्हिटॉनने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतातर्फे हरमनप्रित सिंगने 24 व्या आणि 60 व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 34 व्या मिनिटाला आणि सुखजित सिंगने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. कर्णधार हरमनप्रित सिंगने सामन्यातील शेवटच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविला पण त्याला ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी करता आली नाही. सामन्यातील पुर्वार्धात 2 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाला सलग 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. पण गोलरक्षक पाठकच्या भक्कम गोलरक्षणामुळे त्यांना या संधीचा लाभ घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या आघाडी फळीने शेवटपर्यंत भारतीय बचावफळीवर दडपण ठेवण्यात यश मिळविले होते.