वृत्तसंस्था/ ..पुणे
म्हाळुंगेच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सोमवारपासून सुरू झालेल्या पहिल्या अल्टीमेट खो-खो स्पर्धेत मुंबई खिलाडीजने पहिला विजय मिळविताना राजस्थान वॉरियर्सचा 8 गुणांच्या फरकाने (51-43) पराभव केला.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त या स्पर्धेचे सोमवारी शानदार उद्घाटन करण्यात आले. इंडियन आर्मीच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवून भारतीय पारंपरिकरित्या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेतील सोमवारच्या सामन्यात मुंबई खिलाडीजने राजस्थान वॉरियर्सचा केवळ 8 गुणांच्या फरकाने पराभव केला. मुंबई खिलाडीज संघातर्फे गजानन शेंगलने सर्वाधिक म्हणजे 16 गुण नोंदविले. या संघाचा कर्णधार विजय हजारे आणि रोहन कोरे त्याचप्रमाणे अविक सिंघा यांची कामगिरीही दर्जेदार झाली. या सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान वॉरियर्सने मुंबई खिलाडीजवर 18-4 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर मुंबई खिलाडीजच्या खोखोपटूंनी दर्जेदार कामगिरी करत राजस्थानवर 29-20 अशी आघाडी मिळविली. राजस्थान वॉरियर्सने त्यानंतर 21 गुण घेत मुंबई खिलाडीजवर 41-33 अशी आघाडी मिळविली होती पण शेवटच्या सत्रामध्ये मुंबईने 18 गुण मिळवित राजस्थान वॉरियर्सचे आव्हान 51-43 असे संपुष्टात आणले. मुंबई खिलाडीज संघातील एस. श्रीजेश याची सामन्यातील सर्वोत्तम बचावपटू म्हणून निवड करण्यात आली तर मुंबईचा कर्णधार हजारेला सामन्यातील सर्वोत्तम खो चा पुरस्कार मिळाला. याशिवाय राजस्थानचा मजहर जमादार हा या सामन्यातील सर्वोत्तम आक्रमक खोखोपटू ठरला.
या स्पर्धेत एकूण 6 प्रँचायझी संघांचा समावेश असून सदर स्पर्धा 22 दिवस चालणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्टस् नेटवर्क वाहिनीवर विविध भाषेमध्ये केले जात आहे. साखळी टप्प्यातील आघाडीचे चार संघ बाद फेरीसाठी पार ठरतील. बाद फेरी प्लेऑफ पद्धतीने खेळविली जाईल.