सकाळी गारठा, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाने पळापळ
प्रतिनिधी / सातारा
गेल्या चार दिवसांपूर्वी जिह्यात थंडीची लाट आली होती. थंडीची लाट कायम राहिल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच शुक्रवारी सकाळी एका दिवसात तीन ऋतूंचा अनुभव सातारकरांना चांगलाच आला. सकाळी गारठा, दुपारी गरमी तर संध्याकाळी पावसात पळापळ असे चित्र होते. या वातावरणामुळे पिकावर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
सध्या सुगीचे दिवस ग्रामीण भागात सुरू आहेत. भात काढणी, भुईमूग काढणी, मळणी आणि काढलेल्या पिकांच्या शेतात पुन्हा शाळू, गहू, हरभरा यांची पेरणी सुरू आहे. सगळी कामाची धांदल सुरू आहे. असे असताना चार दिवसांपूर्वी थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे हुडहुडी भरल्याचे वातावरण झाले होते. आणखी थंडी वाढेल असे चित्र होते. असे असताना शुक्रवारी सकाळी थंडीची चाहूल होती. पहाटे वातावरण तसे होते. मात्र दुपारी गरमीचे वातावरण जाणवू लागले. ढग दिसू लागले. सायंकाळी 7 वाजता सातारा शहरात पावसाला सुरुवात झाली. बऱयाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानक, मोती चौक, राजवाडा, गोडोली, शाहूनगर परिसरात पावसाला सुरुवात झाली. रस्ते ओलेचिंब झाले. पावसाने चांगली पळापळ झाली. दरम्यान, भाजी मंडई, सदाशिव पेठेतल्या पदपथ विक्री करणाऱया दुकानदारांची दुकाने आवरण्याची गडबड झाली. सातारा तालुक्यातील परळी, नेले, किडगाव, माहुली, महागाव या गावात ही पाऊस झाला. तसेच कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात, जावली तालुक्यातील अनेक गावातही पावसाने हजेरी लावली. ज्वारी पिकासाठी पाऊस समाधानकारक असला तरी काही ठिकाणी भात काढणी सुरू आहे. त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.