पत्रकार परिषदेत विधानसभेचे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांची माहिती : 9 विधेयके मंजूर, 41 तास 20 मिनिटे कामकाज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडले आहे. सत्ताधारी, विरोधी पक्ष तसेच अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळेच हे अधिवेशन यशस्वी झाले असून या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारचे, येथील अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करत असल्याचे विधानसभेचे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील माहिती दिली. सोमवार दि. 19 पासून अधिवेशनाला सुरुवात झाली. शुक्रवार दि. 30 रोजी अधिवेशन संपणार होते. मात्र त्यापूर्वीच एक दिवस आधी अधिवेशन संपविले आहे. एकूण 41 तास 20 मिनिटे कामकाज झाले. 12 विधेयके मांडण्यात आली. त्यामधील 9 विधेयके मंजूर केल्याचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सांगितले.
विविध मंडळांच्या संयुक्त समित्यांची मुदत संपलेली आहे. त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. पुनर्रचना करण्याचे सर्व अधिकार सभाध्यक्षांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. या अधिवेशनामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आहे. अधिवेशनामध्ये पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकबाबतही अधिवेशनात चर्चा झाली आहे, असे सांगितले. मात्र यावेळी पत्रकारांनी उत्तर कर्नाटकबाबत ठोस असे कोणतेच निर्णय झाले नाहीत, असे सांगितले. त्यावर थोडी घाईगडबड झाली. मात्र उत्तर कर्नाटकबाबत चर्चा झाली आहे. पुढील अधिवेशनामध्ये निश्चितच अधिक चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेमध्ये चर्चेसाठी नियम 69 वरून 17 सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामधील पाच सूचनांवर चर्चा झाली आहे. यावेळी सीमाप्रश्नाबाबत ठरावदेखील करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. या अधिवेशनामध्ये एकूण 2125 प्रश्न स्वीकारण्यात आले होते. सभागृहामध्ये 150 प्रश्न मांडण्यात आले. त्यामधील 146 प्रश्नांवर सरकारने उत्तरे दिली आहेत. 1923 पैकी 1614 प्रश्नांना उत्तरे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेवेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, जि. पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आदी उपस्थित होते.
सभागृहात 85 प्रश्नांवर चर्चा…
सभागृहामध्ये 289 लक्षवेधी सूचना केल्या होत्या. 85 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तर 190 प्रश्नांना उत्तरे देण्यात आली आहेत. शून्य तासावेळी 40 सूचनांवर चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या सभागृहात विश्वगुरु बसवेश्वर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. याचबरोबर विधानसभेच्या आवारात राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे पुतळे बसविण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले आहे, असे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सांगितले.