54 वा वाढदिवस उत्साहात साजरा : सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर
खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांचा 54 वा वाढदिवस येथील मलप्रभा क्रीडांगणावर मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष बाबुराव देसाई होते. यावेळी राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मराठा प्राधिकरणाचे अध्यक्ष मारुती मुळे, बैलहोंगलचे आमदार महंतेश दोडगौडर, अवरोळी मठाचे चन्नबसव स्वामी, शंभूलिंग स्वामी, बाळेवाडी मठाचे शिंगनाथ स्वामी, तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्यासह तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण सवदी यावेळी बोलताना म्हणाले, अरविंद पाटील यांची जनसेवा ही कौतुकास्पद आहे. त्यांचे जनमानसातील स्थान पाहता निश्चितच खानापूर तालुक्याचे भाजपचे ते नेतृत्व करू शकतील. भाजप हा शिस्तीचा पक्ष असून यात शिस्तीला फार महत्त्व आहे. पक्षनिष्ठा आणि शिस्त यामुळेच भाजप देशाचे नेतृत्व करत आहे. मी पराभूत होऊनदेखील उपमुख्यमंत्री झालो हीच पक्षनिष्ठेची पोचपावती आहे. यासाठी खानापूर तालुक्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणीही पक्षविरोधी कारवाया करू नयेत. अन्यथा पक्ष निश्चितच त्यांच्यावर कारवाई करेल. तसेच विठ्ठल हलगेकर यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर नाराज न होता पक्षात कार्यरत राहावे. पक्ष त्यांचा निश्चितच योग्य विचार करेल, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.
बसवकल्याण येथे शिवपुतळा उभारणार
मराठा प्राधिकरणाचे अध्यक्ष मारुती मुळे म्हणाले, अरविंद पाटील यांच्या शिफारशीवरून जिह्यातील तीन हजारपेक्षा जास्त युवकांना आम्ही वेगवेगळ्य़ा पद्धतीने मदत केली आहे. दावणगिरी येथील शहाजी महाराजांच्या समाधीस्थळांच्या विकासासाठी बोम्माई यांच्याकडे पाठपुरावा करून शंभर कोटी मंजूर करून घेतले आहेत. या कामात अरविंद पाटील यांचा फार मोठा सहभाग आहे. बसवकल्याण येथे दहा कोटी खर्चून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याच्यासाठीही अरविंद पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तालुक्यातील जनतेची प्रामाणिक सेवा हातून घडली आहे. यासाठी येणाऱया काळात ते निश्चित तालुक्याचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा आहे. राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनीही अरविंद पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. येणाऱया काळात ते तालुक्याचे नेतृत्व करतील, यात शंका नसल्याचे त्यांनीही सांगितले. यावेळी सत्कार समितीतर्फे अरविंद पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करून वाढदिवस साजरा केला.
मी जनतेचा सेवक
सत्काराला उत्तर देताना अरविंद पाटील म्हणाले, मी जनतेचा सेवक असून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळेच ही वाटचाल करू शकलो. आयुष्यात मला कोणी गॉडफादर नाही. सामान्य जनतेचा विश्वास हेच माझे गॉडफादर आहेत. तालुक्यातील राजकारण हे गलिच्छ वळणावर येऊन पोहोचले असून, तालुक्याबाहेरून तालुक्यात येऊन आमिषे दाखवून मतदारांना भुलवत आहेत. कमिशनमुळे विकासाची त्रेधा उडाली आहे. टक्केवारीमुळे कंत्राटदार तालुक्यात येऊन काम करण्यास धजावत नाही. त्यामुळे विकास पूर्णपणे खुंटला आहे. यासाठी निवडणुकीत जनतेने योग्य विचार करून तालुक्यातील कार्यकर्त्यालाच आमदार म्हणून निवडून द्यावे. यावेळी आमदार महंतेश दोडगौडर, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, विठ्ठल हलगेकरसह अनेकांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली. अध्यक्ष बाबुराव देसाई यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.