अध्याय पंचविसावा
त्रिगुणांचे एकमेकात मिसळून होणाऱया बेमालूम मिश्रणामुळे माणसाचा स्वभाव सतत बदलत असतो. क्षणात एक गोष्ट त्याला आवडते तर पुढल्या क्षणी त्याचा विचार बदलतो आणि त्याला वेगळीच गोष्ट आवडू लागते. स्वधर्म योग्य रीतीने निभावला तर आपला उद्धार होईल या संत वचनावर त्याचा विश्वास बसून, त्याच्या वाटय़ाला आलेल्या स्वधर्मकर्मामध्ये त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते. त्यामुळे, त्याला क्षणभर विरक्ती येते पण त्रिगुणांच्या प्रभावामुळे, ती तेव्हढय़ापुरतीच असते. त्यामुळे दुसऱया क्षणी त्याला भोगफळाची आशा वाटू लागते, म्हणजेच तो क्षणात ममतेच्या तावडीत सापडतो. कामाचाही प्रकार तसाच आहे. क्षणैक निष्कामतेमध्ये अत्यंत प्रेम असते, क्षणात स्त्रीभोगाविषयी आसक्ती उत्पन्न होते किंवा क्षणात परस्त्रीबद्दल कामवासना उत्पन्न होते. याचप्रमाणे द्रव्याचीही गोष्ट आहे. क्षणात तो द्रव्याची आशा सोडून देतो, क्षणात त्याला द्रव्याविषयी अत्यंत आवड उत्पन्न होते किंवा क्षणामध्ये दुसऱयाचे द्रव्य तो लुबाडून घेतो. त्रिगुणांमुळे धर्म तीन प्रकारचे, कर्म तीन प्रकारचे आणि पैसा मिळविण्यामध्येही तीन भेद होतात. या गुणवृत्तीच्या भेदांमुळे लोक स्वधर्म सोडून अकर्म म्हणजे नको ती कर्मे करत असतात. धर्म सात्त्विक, अर्थ तामस आणि काम राजस असतो. श्रद्धा, द्रव्य आणि रती ही त्यांची अनुक्रमाने फळे आहेत. मनुष्य धर्म-अर्थ-काम या तिहींमध्ये आसक्त होतो हे गुणांचा सन्नीपात झाल्याने म्हणजे गुणांच्या मिश्रणाने होते. जेव्हा माणूस सकाम कामात किंवा स्वधर्मपालनात नि÷ा ठेवून ती ती कामे करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी तिन्ही गुणांचे मिश्रण असते. आता गृहस्थाश्रमाचंच उदाहरण सांगतो. गृहस्थाश्रम हा चारही आश्रमात सर्वश्रे÷ आश्रम मानलेला आहे कारण तो इतर तीन आश्रमांना आश्रय देत असतो परंतु त्यातही हे तीन गुणांचे मिश्रण कसे कार्यरत असते. तसं बघितलं तर गृहस्थाश्रम हे अमुक एक घडावे किंवा अमुक एक घडू नये अशा इच्छांचे आगरच असते. म्हणजे त्यातील कर्मे मनात काही ना काही इच्छा धरूनच केलेली असतात. त्यामुळे दुषित झालेले चित्त शुद्ध व्हावे म्हणून नित्यनैमित्तिक कर्मे करण्याचा स्वधर्म सांगितला आहे. गृहस्थाच्या घरात दळणे, कांडणे, चूल पेटविणे, पाणी भरणे व झाडणे ह्या क्रिया करताना जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने जीवहिंसा घडत असते, त्याला पंचसूना दोष असे म्हणतात. हे घडवून आणण्यात तमोगुण मुख्यत्वाने क्रियाशील असतो. घरामध्ये स्त्रीपुरुष विषयसुखाचा उपभोग घेतात, म्हणून गृहस्थाश्रमात रजोगुणही आहे. या रज, तम गुणामुळे चित्तात निर्माण झालेले दोष निवारण करण्यासाठी, नित्य नैमित्तिक कर्म करणे आणि स्वधर्म पाळणे, हीच गृहस्थाची मुख्य कर्तव्ये सांगितली आहेत. हे पार पाडले की, गृहस्थाश्रमामध्ये सत्त्वगुणही सुलभ होतो. ज्याप्रमाणे कोणताही रंग नसलेले पाणी ज्या रंगात मिसळावे त्या रंगाचे होते किंवा कोणत्याच रंगाने न रंगताही स्फटिक त्या रंगासारखा भासू लागतो, त्याप्रमाणेच गुणांच्या संगतीने गुणांच्या पलीकडे असलेला आत्माही गुणकर्मामध्ये वागू लागतो. ज्याप्रमाणे सोन्याला कस लावला की, त्यात सोने किती व पितळ किंवा तांबे किती हे स्पष्ट होते त्याप्रमाणे माणसाच्या स्वभावाची पारख त्याच्या गुणातून होते. माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे हे लक्षात येते. जो योग्य प्रकारे इंद्रियनिग्रह करतो, जो शमदमात निरंतर खेळत असतो, ज्याच्या अंतःकरणांत शांती राहते, तोच खरोखर सात्त्विक आहे असे समज. जो सदोदित फलेच्छेने लोभी बनलेला असतो, संसारभोगातील सुखाची इच्छा करतो, द्रव्यासाठी पाहिजे ते ढोंग करतो, तो मनुष्य रजोगुणी होय, हे लक्षात ठेव. स्वधर्मामध्ये ज्याला प्रेम वाटत नाही, अधर्मप्रवृत्तीच आवडते, क्रोधाने आणि लोभाने ज्याची स्फूर्ती गिळूनच टाकलेली असते, तो खरोखर तामस होय. अशा प्रकारे पुरुषाचे कर्माचरण पाहून त्याचे लक्षण ओळखावे. ह्याचे नाव अनुमान. विचारशील पुरुष हे जाणतात.
क्रमशः