ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केली. तसेच त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतः चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे. त्यांची संवादशैली ही प्रत्येकालाच प्रभावित करणारी होती. ‘वजीर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे. मराठी साहित्य, सांस्कृतिक ,राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात या ‘वजीर’ची खूप चर्चा झाली. त्यासोबतच नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकर यांचे मित्र रामभाऊ अभ्यंकर यांची भूमिका नेहमीच स्मरणात राहील. एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनही ते कायम स्मरणात राहतील.
अधिक वाचा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन