खानापुरात काँग्रेसचे एकदिवसीय आंदोलन, अनेकांचा आंदोलनाला पाठिंबा
वार्ताहर /खानापूर
गेल्या आठ-दहा वर्षात मोदी सरकारने देशात हुकुमशाही निर्णय घेऊन देशाच्या अस्तित्वाला धोका आणला आहे. हिंदुत्वाच्या नावावर देशातील युवकांना भाजपात सामील करून अग्निपथच्या नावाखाली देशातील युवकांना आकर्षित करण्याचा एक वेगळा पायंडा भाजप सरकारने आखला आहे. चार वर्षानंतर अग्निपथच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीची संख्या वाढणार आहे. त्यामुळे देशात सैनिक भरतीसाठी नव्याने जारी करण्यात आलेली अग्निपथ योजना ही देशातील युवकांना फसवणारी योजना आहे. ही योजना मागे घेण्यात यावी, असे विचार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने रविवारी सकाळी 10 पासून सायंकाळी 5 पर्यंत श्री राजा शिवाजी चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या आंदोलनाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी यासह अनेकांनी उपस्थिती दर्शवून पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही अग्निपथ योजना केंद्र सरकारने तात्काळ मागे घेऊन युवकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून योजनेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. देशात गेल्या आठ वर्षामध्ये आणण्यात आलेले कायदे हे शेतकरी व सर्वसामान्य विरोधी आहेत. यासाठी अशा कायद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जनतेने उभे रहावे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस नेते अडिवेश, संतोष हंजी, मल्लिकार्जुन वाली, दशरथ बनोशी, अमृत पाटील, बसवराज पांडव आदींनी विचार मांडले. उपस्थितांचे स्वागत व आभार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांनी मानले. यावेळी दिवसभरात अनेकांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात भाग घेतला.