सुमित्रा महाजन यांचे उद्गार : भारत विकास परिषदेच्या महिला संमेलनाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ फोंडा
स्त्री ही मुळातच सक्षम व कणखर आहे. कितीही प्रतिकुल परिस्थितीत ती ठामपणे उभी राहू शकते. स्त्रियांनी आपल्या क्षमता तपासून स्वत:ला सिद्ध करावे. समाजाचे सारथ्य करण्याची कुवत तिच्यात आहे, असे उद्गार लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी काढले. भारत विकास परिषदेच्या पश्चिम विभागीय महिला संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
नागेशी फोंडा येथे भारत विकास परिषदेच्या गोवा प्रांतातर्फे आयोजित केलेल्या या दोन दिवशीय महिला संमेलनाचे शनिवारी सुमित्रा महाजन यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पश्चिम विभागीय अध्यक्ष सुधीर पाठक, महासचिव लक्ष्मीनिवास जाजू, संस्कार सचिव यदुचंद्र नायक, गोवा प्रांत अध्यक्ष किरण वेर्णेकर व महिला संयोजिका वर्षा नायक हे व्यासपीठावर उपस्थित होते. गोवा, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून तिनशेहून अधिक महिला प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाल्या आहेत. आपल्या उद्घाटकीय भाषणात सुमित्रा महाजन यांनी नवीन पिढीला संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी महिलांनी उचलण्याचे आवाहन केले. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवताना पालकांनी त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये. मुलांनी नेहमीच पहिले यावे हा आग्रह न धरता आली मुले प्रज्ञावंत कशी होतील याकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये कला व संस्कृतीची ओढ निर्माण करावी. त्यांना विविध भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थित महिलांना दिला. भारत विकास परिषद ही सेवा व समर्पण भावनेने कार्य करणारी अत्यंत जुनी संस्था असून आजच्या समाजा समोरील प्रश्न हाताळताना नवीन पिढीला विशेष: मुलींना समुपदेशन करण्याची जबाबदारी त्यांनी उचलावी, असेही त्या म्हणाल्या.
दीप प्रज्ज्वलीत करून सुमित्रा महाजन यांच्याहस्ते दोन दिवशीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात महिला भगिनी सुनियोजित काम करू शकतात. कुटुंब सांभाळतानाच सामाजिक कार्यातही त्या हिरीरिने वावरताना दिसतात. भारत विकास परिषद ही संपर्क, सेवा, सहयोग, संस्कार व समर्पण या पंचसूत्रीवर काम करणारी राष्ट्र समर्पित संस्था असून गोव्यात त्यांनी स्वतंत्र प्रकल्प उभारल्यास त्याला सरकारकडून निश्चितच सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. गोव्याच्या लोकसंख्येत स्त्री पुरुष समतोल असून इतर राज्यात त्यात चिंताजनक फरक आढळून येतो. त्यामुळे स्त्राrभृणहत्येला आळा घालण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुधीर पाठक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात भारत विकास परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. आज रविवार 29 रोजी संमेलनाचा समारोप हाणार असून समारोप सोहळ्याला गोमंतकीय सुपूत्र व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर तसेच नागेश संस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर हे उपस्थित असतील.