आंदोलन करताच एल अॅण्ड टी कंपनीचे अधिकारी दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
जलाशयी पुरेसे पाणी…. पिण्याला थेंबही नाही…. अशी सध्या बेळगावकरांची स्थिती झाली आहे. या कारभाराला वैतागून भांदुर गल्ली आणि परिसरातील महिलांनी शनिवारी दुपारी भांदुर गल्ली, रेल्वेगेटजवळ रस्ता बंद करून आंदोलन छेडले. नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीप्रमाणे आंदोलन करताच एल अॅण्ड टी कंपनीचे अधिकारी दाखल झाले.
बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप व हिडकल जलाशयात पाण्याचा पुरेसा साठा असला तरी सध्या बेळगावकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून एल अॅण्ड टी कंपनीकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन सुपूर्द केल्यानंतर पाण्याच्या बाबतीत नेहमीचीच ओरड सुरू आहे. तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून बेळगावकरांची बरीच गैरसोय झाली.
पाणीपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचना दिली पाहिजे. परंतु ही बाबही एल अॅण्ड टी फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे बहुसंख्य बेळगावकरांना पाणी येणार नाही याची कल्पनाच नव्हती. पाणी येणार नसेल तर संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा ठप्प व्हायला हवा. परंतु अनेक ठिकाणी आस्थापने आणि काही ठिकाणी पाणीटंचाई दिसत नाही. त्यामुळेच भांदुर गल्लीवासीय महिला संतप्त झाल्या. दुर्दैवाने संभाजी उद्यानामागे बांधण्यात येणाऱ्या समुदाय भवनाच्या बांधकामावेळी पाईपलाईन फुटली. त्याचाही परिणाम पाणीटंचाईवर झाला.
कंत्राटदाराला आणि एल अॅण्ड टीशी सतत संपर्क साधला. परंतु कोणीच दाद दिली नाही. त्यामुळे महिलांनी चक्क रेल्वेगेटसमोरच रास्तारोको केला. नाक दाबले की तोंड उघडते.. या म्हणीप्रमाणेच अधिकारी त्वरित दाखल झाले आणि संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिली. दरम्यानच्या काळात कूपनलिका मात्र सुरू करून देण्यात आली. मूलभूत सार्वजनिक सुविधा पुरविण्यामध्ये प्रशासन कमी पडते. तेंव्हा नागरिकांनी आवाज उठविला तरच त्यांना न्याय मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.