15 हजाराची लाच स्वीकारलीः सातबारावरील चूक सुधारण्यासाठी केली पैशाची मागणी
प्रतिनिधी/सांगली
कडेगाव तालुक्यातील खेराडे-वांगी येथील तलाठी श्रीमती मनिषा मोहनराव कुलकर्णी (37, रा. ब्राह्मणपुरी, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी 15 हजाराची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. तक्रारदार यांच्या वडिलांची शासनाने पुनर्वसनासाठी जमीन संपादित करतेवेळी चुकलेली सातबाराची नोंद दुरूस्त करण्यासाठी ही लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना त्याना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांची शासनाने पुनर्वसनासाठी जमीन संपादित करतेवेळी चुकलेली सातबारावरील आणेवारी दुरुस्त करून देण्याकरिता तलाठी मनिषा कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 30 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दिला होता. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे वडिलांचे शासनाने पुनर्वसनासाठी जमीन संपादित करतेवेळी चुकलेली सातबारावरील आणेवारी दुरूस्त करून देण्याकरिता श्रीमती कुलकर्णी, यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती 15 रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी खेराडे-वांगी येथील गावकामगार तलाठी कार्यालय याठिकाणी सापळा लावला असता श्रीमती मनिषा मोहनराव कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 15 हजार रूपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई सांगली लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, चालक स्वप्नील भोसले यांनी केली आहे.