शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत निरंतर पाणी उपलब्ध होणार : मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी /बेळगाव
संपूर्ण शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध कामे युद्धपातळीवर सुरू असून काही ठिकाणी जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. तसेच चोवीस तास पाणीपुरवठय़ासाठी 17 जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी 9 जलकुंभांचे काम सुरू असून वडगाव चावडी आणि अनगोळ परिसरातही जलकुंभांचे बांधकाम करण्यात येत आहे.
शहरातील 10 वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. तब्बल 12 वर्षांनंतर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. शहरातील 48 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या शहरवासियांना 3 ते 4 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत निरंतर पाणी उपलब्ध होणार आहे. सदर काम एल ऍण्ड टी कंपनीला मंजूर झाले असून शहरातील विविध भागात मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आणखी 17 जलकुंभ उभारणार
सध्या पाणीपुरवठय़ासाठी विविध ठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे. 8 ठिकाणी जलकुंभ असून चोवीस तास पाणीपुरवठा योजनेकरिता आणखी 17 जलकुंभांची उभारणी करणे गरजेचे आहे. यापैकी एल ऍण्ड टी कंपनीने 13 जलकुंभांचा आराखडा मंजूर करून घेतला आहे. यापैकी 9 जलकुंभांचे काम सुरू करण्यात आले आहे. चोवीस तास पाणी योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रांतून जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे. येथून विविध परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता जलकुंभांची आवश्यकता आहे.
सहा महिन्यात काम पूर्णत्त्वास
शहरात सध्या कावेरीनगर, उद्यमबाग, मृत्युंजयनगर अनगोळ, वडगाव चावडी, कणबर्गी येथील केएचबी कॉलनीमध्ये, कलमेश्वरनगर, गुड्सशेड रोड तसेच गणेशपूर येथे दोन जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. 5 ते 25 लाख लीटरपर्यंतच्या जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. परिसरात पाणीपुरवठय़ासाठी आणि पाणीसाठा करण्यासाठी जलकुंभ उभारण्यात येत आहे.
सध्या जलकुंभ उभारण्यासह जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू असल्याने सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने चोवीस तास पाणी योजनेंतर्गत नळजोडण्या करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.