जमीन फसवणुकीला बसणार आळा
बेळगाव : सातबारा उताऱ्याला आधार लिंक करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. पॅनकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, गॅस कनेक्शन आदीसाठी आधार क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे. त्याच धर्तीवर सातबारा उताऱ्याला आधार क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी आधार लिंक करण्याचे काम सुरू झाले आहे. तलाठी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांकडून आधार लिंक केले जात आहे.
जिल्ह्यात 10 लाख लहान-मोठ्या शेतकऱ्यांची संख्या आहे. या सर्व शेतकऱ्यांची सातबारा उताऱ्याला आधार जोडणी केली जाणार आहे. या आधार जोडणीमुळे जमीन विक्रीतील फसवाफसवीला आळा बसणार आहे. सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करण्यासाठी मोबाईलद्वारे ओटीपी नंबर टाकून आधार लिंक केला जात आहे. त्यामुळे तलाठी आणि नेम्मदी केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. कृषी खात्याकडून विविध योजना आणि सुविधा पुरविल्या जातात. एकूण शेतकऱ्यांची निर्दिष्ट संख्या आणि उत्पादन याबाबतचा तपशीलही मिळणार आहे. त्याबरोबर शेतात राबणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांची संख्याही समोर येणार आहे. त्याबरोबर एकूण शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्रफळ आणि इतर बाबीही समजणार आहेत.
फसवणुकीला बसणार आळा
सातबारा उताऱ्याला आधार क्रमांक लिंक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बनावट सातबारा उतारा किंवा जमीन मालकाच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी करून जमिनी खरेदी-विक्री करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. जमीन मालकाची तसेच खरेदीदाराची फसवणूक टळणार आहे. यासाठी उताऱ्याला आधार लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.