भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ामध्ये भाजपची संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत. सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याचबरोबर सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करा, संघटितपणे राहून पुढील निवडणुका लढवा, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केली आहे.
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अरुण सिंह बेळगावात आले होते. संकम हॉटेल येथे कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच रणनीती तयार करा, कार्यकर्ते संघटित राहिले तर पक्ष बळकट होऊ
शकतो.
तेव्हा संघटित राहूनच हा लढा लढला पाहिजे. तेव्हा कोणीही आपल्यातील मतभेद दाखवून देऊ नका, असेही त्यांनी चिंतन बैठकीमध्ये सांगितले.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला दिली पाहिजे. जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत आपल्या पक्षाने राबविलेल्या योजनांची माहिती जनतेला मिळत नाही. तेव्हा कार्यकर्त्यांनी बुथनिहाय काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
या चिंतन बैठकीला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, खासदार ईराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, धनंजय जाधव, किरण जाधव, प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली यांच्यासह जिल्हय़ातील आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट करणे
मराठा समाजाला उमेदवारी द्या बेळगाव जिल्हय़ामध्ये मोठय़ा संख्येने मराठा समाज आहे. याठिकाणी मराठी भाषिक संख्याही अधिक आहे. त्यामुळे त्या समाजाला उमेदवारी दिली पाहिजेत. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठा समाज बांधवांची मतेच निर्णायक ठरत आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून येत्या निवडणुकीत मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी राज्य प्रभारी अरुण सिंह यांच्याकडे केली आहे.