अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक : 28 जणांच्या प्रवासाची सोय : 5 मुलांचाही समावेश
बेळगाव : मध्यप्रदेशहून कित्तूरला आलेल्या 28 असाहाय्य कामगारांना प्रशासनाने त्यांच्या मूळ गावी परत धाडले आहे. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 28 कामगारांबरोबर 5 मुलांचेही संरक्षण करण्यात आले आहे. कित्तूर येथील बसस्थानकाजवळ असाहाय्य अवस्थेत हे कामगार उभे होते. 27 जानेवारीच्या सायंकाळी हा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. तहसीलदार व कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी या असाहाय्य कामगारांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली.
आपण मध्यप्रदेशहून आलेलो आहोत. कामधंदा नाही. काय करावे, हे कळत नाही. गावी जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, अशी कैफियत यावेळी या कामगारांनी अधिकाऱ्यांपुढे मांडली. त्यानंतर एका बसमधून त्यांना बेळगावला आणण्यात आले. निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात आली. 28 जानेवारी रोजी निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून त्यांना पुन्हा मध्यप्रदेशला धाडण्यात आले. ते मूळचे मध्यप्रदेशमधील कौदिया, जि. कटणीचे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे प्रांताधिकारी शशीधर बगली, कित्तूरचे तहसीलदार अष्टगीमठ, कामगार खात्याचे ज्योती कांते, राजेश असनोटीकर आदी अधिकाऱ्यांनी हे काम पूर्णत्वास नेले.