प्रेमविवाह ही बाब आता सर्व परिचित आहे. तथापि भारताच्या दृष्टीने पाहिल्यास त्यात नवे असे काही नाही. कारण जगातील पहिल्या प्रेमविवाहाचा उल्लेख सहा ते सात हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात करण्यात आला आहे. ऋग्वेदातील माहितीनुसार सूर्य या देवतेची कन्या सूर्या हिचा प्रेमविवाह झाला होता. वैदिक काळापासून मध्य युगापर्यंत भारतात अनेक प्रेमविवाह झाल्याची नोंद आहे. विविध जातींमध्येही आंतरजातीय विवाह होत होते असे दिसून येते.
हिंदू धर्मामध्ये जात किंवा वर्ण जन्माने ठरतो, असे म्हटले जाते. तथापि वेदांमध्ये याला आधार सापडत नाही. वेदांच्या तत्त्वज्ञानानुसार जन्माने नव्हे तर ज्ञान आणि कर्माच्या आधारावर वर्ण ठरत असतो. भगवद्गीतेमध्येही ‘गुणकर्माच्या आधारावर वर्ण ठरतो’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या जाती व्यवस्थेला वैदिक किंवा पुरातन वाङ्मयाचा आधार नाही, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळेच पुरातन काळात विविध जातींमध्ये होणाऱया विवाहालाही मान्यता होती. म्हणूनच सध्याच्या काळात होणारे दोन भिन्न जातींमधील विवाह भारतासाठी नवे नाही.
विवाह करण्याआधी पत्रिका पाहिली जाते, ती जुळत असेल तरच विवाह करण्याची पद्धत आजही आहे. तथापि पुरातन भारतात किंवा वेद काळात पत्रिका किंवा कुंडली पाहण्याचीही पद्धती नव्हती, असे दिसून येते. यामुळे आताचा काळ हा आधुनिक आहे आणि पूर्वीचा काळ मागासलेला होता, असे मानण्यातही काही अर्थ नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. उलट वेद काळात किंवा पुरातन काळात काही प्रथा आतापेक्षाही आधुनिक होत्या, असे दिसून येते.