उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे..
उपासना म्हणजे नेमकं काय? हे बघायला गेल्यानंतर पुराणकाळातल्या तपश्चर्या साधना किंवा अनुकरण करण्याची एक शक्ती म्हणजे उपासना हे लक्षात येतं. पण आजच्या कलियुगामध्ये आमच्यासारख्या माणसांना या गोष्टींसाठी वेळच उरत नाही. परंतु आम्ही जे रोज काम करतो, आमची जी दिनचर्या आहे, रोजचा व्यायाम, पोहणं, चित्र काढणं, वेगवेगळे पदार्थ बनवणं किंवा वाचन करणं, हीसुद्धा एक उपासनाच आहे. पूर्वी सकाळी उपासना करणं म्हणजेच आराधना करणे हे देवाची कृपा मिळवण्याचं साधन मानलं जायचं. पण आजच्या युगामध्ये अशा उपासनेमुळे आम्हाला पैसा मिळतो. समाजात मान मिळतो आणि मोठेपणा मिळतो. पूर्वीच्या काळी यज्ञ, होम, पूजा, हवन जप अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने केले जायचे. त्याच्यामागे फक्त सगळय़ा जगाचं कल्याण एवढंच चिंतन असायचं. त्यांच्यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या ध्यानधारणा केल्या जायच्या.मंत्रोच्चार उच्चारले जायचे आणि सुंदर अशी प्रार्थना केली जायची. आपल्याकडे सकाळच्या वेळात वासुदेव येतो किंवा सज्जनगडावरची माणसं जय जय रघुवीर समर्थ म्हणून प्रार्थना करतात. अशी प्रार्थना आम्हा सगळय़ांना चांगल्या भावना, चांगले विचार दुसऱयापर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर माध्यमच आमच्या हातात देत असते.
आम्ही सकाळी उठलो की आमचे तळहात एकमेकांवर घासतो आणि ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती’ ही प्रार्थना सुरू करतो. ही प्रार्थना म्हणत असताना लक्ष्मी म्हणजे पैसा हे साधन आमच्या डोळय़ासमोर असते. परंतु जे हात आम्ही हातावरती घासतो, त्या हाताने उत्तम कर्म होऊ दे असा अर्थ त्यातून आपल्याला घ्यायला हवा. हाताने केलेले कर्म हे विचारांच्या नंतरच होत असतं. म्हणून शरीरातील सर्वच अवयवांना चेतना देऊन मगच आम्ही या हातांना विनंती करतो आणि पुढची प्रार्थना म्हणतो. आमचा पाय पृथ्वीवरती पडल्यानंतर त्या पृथ्वी मातेला राग येऊ नये म्हणून ‘समुद्र वसनेदेवी पर्वस्तनमंडले, विष्णुपत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे’ अशी प्रार्थना ऐकल्यानंतर सर्व चराचरालाच क्षमा मागून आम्ही पुढे जात असतो आणि पूर्ण दिवसात आमच्या हातून उत्तम कार्य घडो व या उपासनेची सुरुवात या आमच्या प्रार्थनेतून सुरू होत चांगल्या गोष्टींचा विचार आम्ही सकाळी उठल्या उठल्या अशा श्लोकातून आमच्या मनावरती बिंबवतो. सगळय़ांनी एकत्र येऊन केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात पण त्याची सुरुवात आधी वैयक्तिक प्रार्थना हे करायला लागते.
क्रमशः