प. पू. वामनाश्रम स्वामीजी हळदीपूर यांचे आशीर्वचन : खानापुरात स्वामी समर्थ केंद्राला भेट
वार्ताहर / खानापूर
‘जीवन हे सुख-दुःखाचे भांडार आहे. प्रत्येकाला सुखी-समाधानी राहावेसे वाटते. पण यासाठी मानवाने सत्कर्म व देवाची उपासना व आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे. तरच जीवनात समाधान लाभेल’, असे उद्गार प. पू. वामनाश्रम स्वामीजी हळदीपूर यांनी खानापूर येथे श्री स्वामी समर्थ आधात्मिक केंद्राला दिलेल्या भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आशीर्वचनपर बोलताना काढले.
वामनाश्रम स्वामीजींनी खानापूर येथील स्वामी समर्थ केंद्र तसेच समादेवी गल्लीतील समादेवी मंदिराला भेट दिली. समादेवी मंदिरात पूजाविधी व आरती झाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समाजबांधवांनी प्रेरित व्हावे, असे स्वामीजींनी सांगितले.
यावेळी मंदिराचे व्यवस्थापक दीपक वाळवे, मारुती पाटील यांनी स्वागत करून केंद्रात चालणाऱया उपक्रमांविषयी प. पू. श्री वामनाश्रम स्वामींना माहिती दिली. यावेळी स्वाती कपिलेश्वरी यांनी गुरुवंदन गीत सादर केले, प्रस्तावना सर्वज्ञ कपिलेश्वरी यांनी केली. यावेळी प. पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजींचा खानापूर तालुका वैश्यवाणी समाजाच्यावतीने प्रकाश अंगडी दांपत्याने सत्कार केला.
कार्यक्रमाला खानापूर शहरातील सेवेकरी तसेच निट्टूर, खानापूर, कारलगा, हडलगा, लोंढा, गुंजी, संगरगाळी, रामनगर, बिडी, नंदगड, जांबोटी आदी गावांतील वैश्यवाणी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश अंगडी, सूर्यकांत बाबशेट, महादेव काद्रोळकर, मंजु भुतकी, नगरसेविका जया भुतकी, दत्ता अंगडी, विठ्ठल करंबळकर मंजु कलघटगी, संजू भुतकी, राजू मुरकुंबी, दिनेश करंबळकर, बाळू मोगरे, सुनील पानेरी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. सदानंद कपिलेश्वरी यांनी आभार मानले.