महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेकडून कुत्र्यांची नसबंदी सुरू आहे. महापालिकेकडे लेखी तक्रार केल्यास तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी आपली तक्रार लेखी स्वरुपात द्यावी, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकाऱयांनी केले आहे.
सध्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी केवळ 30 केज आहेत. त्यामुळे आठवडय़ातून दोनवेळा कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया केली जात आहे. ही शस्त्रक्रिया आणि कुत्री पकडण्याची मोहीम दररोज राबविण्यासाठी कुत्री ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. पण ज्या ठिकाणी धोकादायक कुत्री फिरत असल्याची लेखी तक्रार आल्यास त्या ठिकाणाची कुत्री पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. कुत्र्यांना ठार मारण्यास प्राणी दया कायद्यांतर्गत बंदी आहे. त्यामुळे नसबंदी मोहीम राबवितानाही काही प्राणी दया संघटना आक्षेप घेतात. मात्र धोकादायक कुत्री असल्यास त्यांना ठार मारण्याची तरतूद कायद्यात आहे. अलीकडेच धारवाड उच्च न्यायालयाने तसा आदेश बजावला आहे. जर रॅबीजसारख्या आजाराची लक्षणे कुत्र्यामध्ये असल्यास त्यांचा बंदोबस्त करण्याची मुभा दिली आहे. लेखी तक्रार दिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.