भाग-3
रीमाची कॉलेजला जायची वेळ होत आली. ‘अगं रीमा आवर पटापट. थोडी मदत करावी गं कामामधे..तर नाहीच..’ ‘आई अगं वेळ झाला ना गं…उद्या नक्की..’ आई आणि रीमा यांचा हा रोजचा संवाद!! रीमाचा बराच वेळ तयार होण्यात जातो आणि आईला मदत करायला वेळच कुठे असतो. अभ्यास, टय़ूशन अशा अनेक सबबी पुढे येतात. ‘आज उशीर होईल बहुदा’ म्हणत आई काही म्हणायच्या आतच रीमा गडबडीने निघून जाते. रितेशचीही तीच तऱहा. कितीदा हाका मारल्या तरी उठत नाही. मग घाईघाईने उठून आवरतो आणि बाईक घेऊन बेफाम वेगाने निघूनही जातो. आईने तयार करून ठेवलेला नाश्ता करायलाही वेळ नसणारा आणि ‘विसरलो गं आई..सॉरी..’ म्हणणारा रितेश जेल केलेले केस विंचरायला आणि बॉडी स्पे मारायला विसरत नाही. परत केव्हा येईन हे सांगण्याच्या भानगडीत तो पडत नाही आणि विचारलेच तर नक्की काही सांगता येत नाही हे उत्तरही मिळते. दोन्ही मुलांचे जाणवण्याइतपत बदललेले वर्तन आई म्हणून शलाकाला मात्र अस्वस्थ करते आणि एक अनामिक भीती, ताण, दडपण तिला जाणवत राहते. मुले काही चुकीची वागली तर त्यांना ते त्रासदायक ठरेलच पण नातेवाईक, लोक, आई म्हणून शलाकालाच जबाबदार मानतील या विचारातून ती अधिकच अस्वस्थ होते.
टिन एज, मुलांमध्ये होणारे अनेक शारीरिक-मानसिक बदल, अनेकदा बदलणारे वर्तन, मुलांची आणि पालकांची वाढती अस्वस्थता अशा अनेक गोष्टी आपण पाहतो आणि पालक म्हणून अनुभवतोही.. पौगंडावस्थेमध्ये मुलांचे थोडे बदललेले वागणे पालकांना अस्वस्थ करते. मी गंमतीने असे म्हणते की ‘आम्ही कसे आणि कुठून आलो आणि आत्ता कुठे चाललो आणि कधी येणार’ हे मुले जेव्हा सांगत नाहीत तेव्हा आपले मूल वयात आले असे समजावे.
मुळातच पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुलांची काळजी असणे हे स्वाभाविक आहे. मुलांना वळण लागावे यासाठी प्रयत्नशील असणेही योग्यच परंतु मुलांच्या हरएक वर्तनाला, काहीवेळा त्यांच्या चुकीच्या वागण्याला आपणच जबाबदार आहोत किंवा न जाणो ती चुकीची वागतील आणि आपण वळण लावले नाही असे सगळे म्हणतील म्हणून दडपण घेणे कितपत योग्य याचा विचार करायला हवा. मुले म्हणजे मातीचा गोळा, आकार द्याल तसेच होणार हे म्हणायला ठीक परंतु माती आणि मुलामध्ये फरक आहेच ना? मातीपेक्षा वेगळे, सजीव, सतत बदलणारे, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन प्रत्येक मूल वाढत असते. जसे पालकत्व आखिव रेखीव नसते, म्हणजे विशिष्ट नियमांनी बद्ध असे काही पालकत्वाचे गणित नसते. जसा पालकत्व हा एक अनुभवाचा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर अनेक गोष्टी आपणही शिकतच असतो. मुलांच्या वाढीचे, विकासाचे, बदलाचे, कधी शहाणपण शिकवणारे, शहाणपण वाढवणारे, वेगवेगळे अनुभव देणारा पालकत्व हा एक प्रवासच आहे. या प्रवासात चढउताराचे अनेक टप्पे येतातच. पालक म्हणून सजग रहात हा प्रवास करायला आपण मुलांना मदत करायची असते, करतही असतो. परंतु मुलांना दुबळे न बनवता कौशल्याने साथ देणे महत्त्वाचे असते.
मुलांचे या वयातील आवेगपूर्ण वर्तन, विचारात गुंग होणे हे मेंदूतील बदलांमुळेही होत असते. मेंदूतील तंतुंच्या वर एक आवरण तयार होते ज्याला इन्सूलेशन असे म्हणतात. या वयामध्ये ही प्रक्रिया वेगाने घडते त्यामुळे विचारांचा वेग वाढतो. एकाच वेळी येणाऱया असंख्य विचारांमुळेही मुले तंद्रीत राहतात.
या वयात भावनिक मेंदू अतिशय सक्रिय असतो. अर्थात याच वयामध्ये आपल्या वैचारिक मेंदूचा विकास होत असतो. परंतु मेंदूचा हा भाग अर्थात प्री फ्रण्टल कॉरटेक्स पूर्णपणे सक्रिय नसतो. आपल्या मेंदूतील अमाय्गडला हा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो आणि या वयात मेंदूचा हा भाग अधिक सक्रिय असतो. त्याच्या प्रतिक्रियेनुसार भावना निर्माण होतात. वयाच्या सातव्या आठव्या वर्षानंतर ते वयाच्या पंचवीशीपर्यंत प्री प्रंटल कॉरटेक्स हा भाग विकसित होत असतो. म्हणजेच या वयातील मुलांचा वैचारिक मेंदू ‘वर्क इन प्रोग्रेस’ असतो. आमय्गडला मात्र पूर्ण क्षमतेने काम करत असतो. त्यामुळेच या वयामध्ये तीव्र भावना आणि आवेगाच्या भरात काही कृती घडण्याची शक्मयता अधिक असते. मुले परिणामांचा विचार न करता अनेकदा बेभानपणे वागताना दिसतात. अनेकदा लहरीपणाही दिसतो. त्यातच मैत्रीची संकल्पना याच वयात वेगाने आकार घेत असते. सततच्या सूचना किंवा पालक मुलांमध्ये कौशल्याने साधलेला संवाद नसेल आणि दरी निर्माण होऊ लागली तर त्या पातळीवर समजून घेणारे मित्र मैत्रिणी मुलांना अधिकच जवळचे वाटू लागतात. मुळातच या वयात मित्रमैत्रिणींचे अनुकरण करण्याची इच्छा असते. ज्याला जी प्रेशर म्हटले जाते. त्यातूनही अनेकदा मुले वेगळय़ा पद्धतीने व्यक्त होतात. कधी चिल चिल, शिट् यार, बोअरिंगच आहे हे…कुल कुल..अशा पद्धतीचे अनेक निरर्थक शब्दही वापरतात. परंतु पालक म्हणून त्याचे लगेच कोर्टमार्शल न करता मुलांना योग्य वेळ पाहून कौशल्याने समजावून सांगणे हितावह ठरते तर काहीवेळा अशा गोष्टी कितीवेळा होतात हे पाहून.. क्वचित असेल तर अशा गोष्टींना फार महत्त्व न देणेही हितावह ठरते.
जीवनाची वाटचाल करत असताना वयाचे हे टप्पे, होणारे बदल असणारच आहेत परंतु त्याचबरोबर झपाटय़ाने बदलणारे जग, आकार घेणाऱया नवनवीन संकल्पना, जीवनामधे येणारे मोहाचे, आकर्षणाचे, नैराश्याचे क्षण, वेगवेगळय़ा टप्प्यांवर उद्भवणारे ताण तणाव हे देखील असणारच आहे. त्यांना तोंड देण्यासाठी मात्र अधिक सजगतेने मुलांना सक्षम करणे आवश्यक आहे. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसोबतच त्यांच्या मनाच्या मशागतीच्या दृष्टीने जागरुक असणे गरजेचे आहे. त्यासाठी सजगतेची तंत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे. सजगतेच्या छोटय़ा छोटय़ा तंत्राचा अवलंब करत त्यात सातत्य ठेवले तर लक्ष देण्याचे आणि ते हवे तिथेच नेण्याचे कौशल्य विकसित होऊ शकते.
सजगता तंत्र अर्थात ‘माईंडफुल टेनिंग’ मधील मेंदूच्या छोटय़ा छोटय़ा व्यायामाने ‘बिईंग इन दी झोन’ राहणे जमू लागते. विचार आणि कृती यामधला फरक नीट समजू लागतो. स्वतःला थांबविण्याचे कौशल्य विकसित करता येते. अंध प्रतिक्रिया देण्याची सवय, आवेगी वर्तन कमी होते. अर्थात माईंडफुलनेस आणि त्याच्या तंत्राविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.
-ऍड. सुमेधा संजीव देसाई