प्रतिनिधी/ कराड
सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर येथील यशवंत बँकेच्या वतीने कृष्णा घाटावर यशवंत महोत्सवास शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. नाशिकचे भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी यांच्या संगीतमय कथेस प्रारंभ झाला. सलग दोन दिवस या महोत्सवास नागरिक आणि महिलांनी मोठी उपस्थिती लावली होती.
यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यशवंत महोत्सवासाठी कृष्णा घाटावर भव्य व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे, यशवंत बँकेचे पदाधिकारी, मुपुंद चरेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी हे ‘महिमा साडे तीन शक्तिपीठांचा’ या विषयावर संगीतमय कथा सादर करणार आहेत. यात श्री तुळजाभवानी माता, श्री सप्तशृंगी माता, श्री महालक्ष्मी माता, श्री रेणुका माता या देवतांची महती ते संगीतमय कथेच्या माध्यमातून सांगणार आहेत.
शनिवारी पहिल्या दिवशी श्री रेणुकामाता तर रविवारी श्री तुळजाभवानी मातेचा महिमा अतुलशास्त्री सगरे यांनी आपल्या रसाळ वाणी विषद केला. महोत्सवास शहर व परिसरातील नागरिक, महिलांची मोठी उपस्थिती होती.