जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शीखरं नाना परीची रचना केली अपार तेथे नांदतो भोळा शंकर आज मल्हारी मार्तंडाचा सहा दिवसांचा नवरात्र सुरू होत आहे. सह्याद्रीच्या डोंगरदऱयात आपली गुरढोरं, मेंढरं चरायला नेणारे मेंढपाळ गुराखी जंगलामध्ये गोळा करत जगणारे आदिवासी आणि शेतकरी या डोंगराच्याकडे पठारावर असलेल्या दैवताला शरण जाण्याचा हा काळ. अडीअडचणीला साकडं घातलं कांदा मुळा भाकर चटणीचा नैवेद्य दाखवला की सगळा भार हलका होतो. असा हा साधा भोळा मल्हारी मार्तंड. त्याचा पराक्रम आठवायचे हे सहा दिवस. हे नवरात्र म्हणजे गोर गरिबाच्या घरची देव दिवाळीच साऱया गावांमध्ये लगबग सुरू होते. सकाळीच उठून साऱयाजणी सडा सारवण करतात. रांगोळय़ा काढतात आणि दळणाला बसतात. दळण्यासाठी जात्यावर बसतात. त्यांच्या मुखातून या मल्हारीचीच ओवी सुरू होते,
सारागाव या मल्हारीच्या स्वागताच्या तयारीने हरखून जातो. आता कार्तिकातली थंडी हळूहळू कमी व्हायला लागते. जणू कार्तिक आपला गाशा गुंडाळून मार्गशीर्षासाठी मार्ग मोकळा करून निघतो. याच महिन्यामध्ये त्रिगुणात्मक शक्तीचे प्रतीक असलेले श्री दत्तात्रेय यांचाही जन्म. खरंतर हा कालखंड विश्व निर्मितीसाठी ब्रह्मदेवाने निवडलेला. शंकराला या विश्वासाठी भूमी तयार करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. ही भूमी नीटनेटकी करताना शंकराला रुद्रावतार धारण करायला लागला. डोंगरदऱया जंगलं नदी सरोवर हे सगळं तयार करताना सगळं विश्व सामावलं जाईल याची आठवण ठेवायला लागत होती. आता फक्त एकच काम शिल्लक राहिलं होतं, ते म्हणजे समुद्राच्या पोटात असलेला खजिना काढणे. देवांना बुद्धिमत्तेने काढता आला असता पण त्यासाठी शक्ती लागणार होती. आणि शक्ती होती असूरांकडे विष्णू स्वतः असूरांच्या देवांना म्हणजे कचेस्वराला भेटायला गेले आणि या कामाची कल्पना दिली. समुद्रमंथनातून जे जे निघेल ते दोघांनी निम्मे निम्मे वाटून घ्यायचं असं ठरलं. आणि कामाला सुरुवात झाली. बऱयाच गोष्टी देवांनी परस्पर घेतल्या आणि राक्षसांच्या वाटय़ाला काहीच येईना. एवढय़ात हलाहल वर आले ते घ्यायला कोणीच पुढे येईना, शेवटी शंकरांनी ते एकटय़ाने पचवलं नंतर आलेला अमृत मात्र राक्षसांनी पळवलं. त्यांच्या हातून ते घेण्यासाठी आता विष्णूने मोहिनीरूप धारण केलं. राक्षसांच्या हातातून ते अमृत पळवून पुन्हा देवांकडे आलं. गडबडीत एक ब्रह्म घोटाळा झाला. त्या मोहिनी रूपाने साक्षात शंकर घायाळ झाले आणि मोहिनीला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागले. धावत असताना अनेकदा पडले. त्यांना लागलं हे सगळं पाहून पार्वतीला अतिशय राग आला आणि तिने आपली जीवनयात्रा संपवली. आता मात्र शंकर भानावर आले आणि त्यांनी विष्णूलाच प्रार्थना केली विष्णू अग्नि रूपाने ज्योती स्वरूपात पार्वतीमध्ये प्रविष्ट झाले. शंकरांना पार्वती मिळाली तो जन्म होता मल्हारीचा आणि पार्वती होती म्हाळसा. क्रमशः