एका खटल्यातील फिर्यादीने नोंदविली साक्ष : पुढील सुनावणी 17 ऑगस्टला होणार
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळ्ळूरच्या जनतेला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावरच 7 खोटे गुन्हे दाखल केले. त्यामधील एका खटल्याच्या सुनावणीला बुधवारी प्रारंभ झाला आहे. जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये फिर्यादी शेट्टय़ाप्पा पुन्नाप्पा ब्याळी (मूळचा बसवनबागेवाडी, सध्या रा. सदाशिवनगर) यांनी साक्ष नोंदविली.
साक्ष नोंदविताना त्यांनी 100 ते 200 जणांचा जमाव आला. मात्र त्यामधील हेच आहेत की नाही? हे मी ओळखू शकत नाही, अशी साक्ष दिली. यामुळे आता या खटल्यातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. बुधवारी झालेला खटला क्रमांक 794/15 मध्ये 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये कुमार मासेकर, मनोज नायकोजी, केदारी पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंग अष्टेकर, प्रकाश कुगजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण न्यायालयात हजर होते. बुधवारी दोन जणांची साक्ष होती. मात्र फिर्यादीची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे. या सर्वांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील आणि ऍड. हेमराज बेंचण्णावर हे काम पाहत आहेत.
दोन खटल्यांची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
बुधवारी न्यायालयामध्ये आणखी दोन खटल्यांची सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. खटला क्रमांक 306 आणि 167 मधील कार्यकर्ते व महिला उपस्थितीत होत्या. मात्र काही कार्यकर्त्यांवर वॉरंट काढण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही खटले पुढे ढकलले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.