पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. दरम्यान, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेले चार ते पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हय़ात गारपिट झाल्याने शेती उद्धवस्त झाली आहे. मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने राज्याला झोडपले आहे. आधीच्या नुकसानीचे पंचनामे होत असतानाच पुन्हा गारपिटीने झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर, यवतमाळ, जालना, परभणी, अमरावती, अकोला आदी जिल्हय़ांत गारपीट झाली आहे. यामुळे उभी पिके आडवी झाली आहेत. दरम्यान, रविवारी कोकण गोवा वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील. यावेळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. सोमवारी केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’ असून, त्यानंतर मात्र पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा : पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी
देशभर पाऊस
वातावरणातील बदलामुळे देशभर अवकाळी पावसाचे सावट आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तर, वायव्य, दक्षिण, पूर्व, पूर्वोत्तर भारतातही पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान वाढणार
येत्या 24 तासांनंतर राज्यात कमाल तापमान वाढणार आहे. कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.