पुणे / प्रतिनिधी :
Yellow alert in the state from today राज्यातील पावसाचा प्रभाव थोडाफार कमी झाला असून, पुढील तीन दिवस अनेक भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तरपश्चिम मध्य प्रदेश तसेच लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, येत्या 72 तासांत हे क्षेत्र वळसा घालून उत्तरपूर्वेच्या दिशेने म्हणजे उत्तर प्रदेशकडे मार्गक्रमण करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हे क्षेत्र अरबी समुद्राकडून येणारे बाष्प खेचत असल्याने राज्यातील पावसाचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे. तसेच यामुळे उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या भागात 17 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील ऑरेंज अलर्ट अर्थात जोरदार पावसाचा इशारा हटला असून, राज्यातील अनेक भागात शुक्रवारी यलो अलर्ट आहे. यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र व कोकणातील जिल्हय़ांचा समावेश आहे. नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्हय़ांचा समावेश आहे. शनिवारी रायगड, पुणे जिल्हा, तर रविवारी जळगाव, औरंगाबाद जालन्याला वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.