सुधाकर काशीद : तरुण भारत कोल्हापूर
काल एक एप्रिल. एकमेकाला एप्रिल फुल करण्याचा दिवस. यात जरूर गंमत होती. चेष्टा मस्करी होती. एका क्षणापुरती ही मस्करी ठिकही होती. पण अस एखाद्याचं कोणी रोजच एप्रिल फुल करू लागलं तर?
होय, इथले तीस पस्तीस जण गेली अनेक वर्षे रोजच एप्रिल फुल अनुभवत आहेत. “आई तुला महिन्या पंधरवड्याला रोज भेटायला येतो”, “बाबा गावच्या जत्रेला तुम्हाला पालखीला नेतो”, “आई, बब्याच्या वाढदिवसाला तुला न्यायला येतो” असल्या आशा दाखवत मुलांनी वृहाश्रमात ठेवलेल्या तीस वृद्धांच्या वाट्याला गेली कित्येक वर्षे अशा एप्रिल फुलचा क्षण येतो आहे. आपल्या घरचं कोणी तरी भेटायला येईल याची वाट बघुन बघुन हे वृद् थकुन गेले आहेत. त्यांच्या साऱ्या आयुष्याचचं जणू एप्रिल फुल झाले आहे.
आर.के. नगर मधल्या दोन आज्जीचा गेल्या आठवड्यात चार पाच दिवसाच्या अंतराने मृत्यु झाला. एकीच वय होतं ऐंशी , पंच्याऐंशी. दुसरीच होतं सतर बहाहतर. ती तर रोज वृद्धाश्रमाच्या गेटकडेच बघत बसायची. त्यांच्या घरातली अडच ण किंवा परिस्थिती माहिती नाही. पण त्यांना कोणीही कधी भेटायला आलं नाही. त्यातली एक आजी तर वृद्धाश्रमातल्या अंगणात असलेल्या तुळशीला रोज पाणी घालायची. डोळे मिटुन हात जोडायची. कोण जाणे, त्या बंद डोळ्यासमोर घरातली कोण कोण तरळुन जायची. ही झाली केवळ दोन उदाहरणे. पण आठवणीच्या गर्तेत असलेले तीस पस्तीस वृद्ध येथे आहेत. प्रत्येकाची येथे येण्याची कारणे वेगवेगळी आहेत. वृद्धाश्रमाचे शिवाजीराव व शरद पाटोळे त्यांच्यासाठी जेकाही करता येईल ते करत आहेत. पण शेवटी आपलं ते आपलचं असतं. आणि आपल्यातलं कोण भेटायला येत नसेल तर त्यापेक्षा दुसरं भयानक एप्रिल फुल दुसर कोणतं असणार आहे… सुधाकर काशीद. तरुण भारत कोल्हापूर.