ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुढी पाडव्याच्या सभेतील राज ठाकरेंच्या (raj thackeray) वक्तव्यांनंतर महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून वादाला सुरुवात झाली आहे. राज यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असताना आता उत्तर प्रदेशात (uttar pradesh) मात्र योगी सरकारने लाऊडस्पीकरसंदर्भात (loudspeaker) कडक निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी मंदिर असो वा मशीद कुठेही बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावले असतील, ते तात्काळ हटवावेत, असे निर्देश सरकारने प्रत्येक पोलिस ठाण्याला दिले आहेत. तसेच धार्मिक स्थळांवर नियमानुसार ध्वनिक्षेपकांचा वापर करावा. या संदर्भात अध्यादेश जारी करत, अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व पोलीस ठाण्यांना मोहीम राबवून बेकायदेशीर व मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर तातडीने हटविण्यास सांगितले आहे. तसेच कारवाईचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत शासनाला पाठवावा. तसे न केल्यास संबंधित स्टेशन प्रभारींवर कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी (Awanish Awasthi) यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तांना धर्मगुरूंशी संवाद साधून बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जे कायदेशीर आहेत त्यांच्या आवाजासंदर्भातील ठरावीक नियमांचे पालन सुनिश्चित केले पाहिजे. १० मार्च २०१८ आणि ४ जानेवारी २०१८ च्या आदेशाचा संदर्भ देत नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
उत्तर प्रदेशातील आतापर्यंत, १२५ धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवले आहेत. याशिवाय सुमारे १७ हजार लोकांनी स्वतः आवाज कमी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर मानकांनुसार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. या स्पीकरचा आवाज फक्त त्या आवारातच राहिला. या आदेशानंतर लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.