प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुक्यातील शेरेचीवाडी येथील सिद्धनाथाची यात्रा आज होती. त्या यात्रेनिमित्ताने सकाळी डोंगरमाथ्यावर असलेल्या मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी पहाटेपासून ग्रामस्थांची रिघ लागली होती. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास मंदिरापासून नजिकच्या अंतरावर मधमाशा मोहोळ उठले अन् ते ग्रामस्थांच्या दिशेने आले. पळापळ सुरु झाली. त्यामध्ये उडालेल्या गोंधळात सोमेश्वर विलास कदम (वय 16, रा. आंबळे, ता. पाटण) हा कडय़ावरुन खाली पडला. तर मधमाशांच्या चाव्याने आठ जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, कडय़ावरुन खाली पडलेल्या सोमेश्वरचा जागीच मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
सातारा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर शेरेचीवाडी हे छोटेसे गाव आहे. या गावची यात्रा दि. 24 रोजी होती. त्या यात्रेमध्ये एक पूर्वीपासूनची परंपरा आहे की गावातील ग्रामदैवता सिद्धनाथचे मंदिर हे डोंगरपठारावर असून तेथे नैवेद्य दाखवला जातो. तो नैवैद्य प्रत्येक घरातील व्यक्ती घेवून सकाळीच जात असतात. त्याप्रमाणे रविवारी सकाळी नैवेद्य दाखवण्यासाठी गावातून प्रत्येक घरटी व्यक्ती गेलेली होती. मंदिराच्या परिसरात सुमारे 100 ते दीडशे जण असतील. त्याच दरम्यान, मंदिरापासून काही अंतरावर एका झाडावर असलेले मधमाशांचे मोहोळ उठले अन् ते माणसांच्या दिशेने येवू लागले. त्यामुळे एकच पळपाळ सुरु झाली. अरुंद असलेल्या वाटेमुळे व पठारावर उडालेल्या गोंधळातही आठ जणांना मधमाशा चावल्याने जखमी झाले. तर त्याच मधमाशांच्या चाव्यापासून वाचवण्यासाठी स्वतः सोमेश्वर हा कडय़ाच्या दिशेने पळाला. तोच त्याचा कडय़ावरुन पाय घसरला अन् थेट दरीत कोसळला. आजुबाजुच्या ग्रामस्थांनी व त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. काहींनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सना बोलवले. शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, आदित्य पवार, देवेंद्र गुरव, सिद्धार्थ गायकवाड हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी व ग्रामस्थांनी त्यास दुपारी दरीतून बाहेर काढले. 108ची रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे शेरेचीवाडीसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.