रत्नागिरीनजीकच्या जयगड-उंडीफाटय़ावरील घटना
वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील जयगड-उंडीफाटय़ावर बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास स्कूलबस व दुचाकीस्वारामध्ये झालेल्या भीषण अपघातात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
स्वप्निल सुरेश गुरव (35, रा. मालगुंड बाजारपेठ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्निल गुरव हा मालगुंड येथून जयगड येथे एका खासगी कंपनीत कामाला जात होता. आपले कंपनीतील काम आटपून दुपारी 3 च्या सुमारास जयगडवरून मालगुंडकडे येत असताना खंडाळ्य़ाहून जयगडकडे जाणाऱया स्कूलबसच्या चालकाने जयगड उंडीफाटय़ावर दुचाकीला धडक दिली. या धडकेत स्वप्निलचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला धडक दिलेल्या स्कूल बसचालकाचे नाव सागर सुभाष खाडे (जयगड) असे आहे. या बाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान आकस्मिक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे स्वप्निलच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला आहे. स्वप्नीलच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, बहीण असा परिवार आहे.
त्याच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीतील त्याचा मित्रपरिवार, नागरिक तसेच त्याचे नातेवाईक खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाले होते. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचा मृतदेह नेण्यात आल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनास्थळी जयगड पोलीस ठाण्याकडून पंचनामा करण्यात आला.