धामोड/ वार्ताहर
धामोडपैकी लाडवाडी ( ता. राधानगरी )येथे विद्युत प्रवाह नदीत सोडून मासेमारी करताना चाफोडी पैकी दोनवडी ता. करवीर येथील अभिजित अर्जुन हळदे (वय २२) या युवकाचा मृत्यू झाला आहे . हि घटना मंगळवारी दुपारी लाडवाडीजवळील तुळशी नदीपात्रात घडली.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित हळदे हा युवक व त्याचे साथीदार लाडवाडी येथे तुळशी नदीत विजप्रवाह सोडून मासेमारी करत होते. नदितील पाण्यात प्रवाह सोडला असता एक मोठा मासा पाण्यातुन तडफडत बाहेर आला . त्याला पकडण्यासाठी संबंधित युवकाने पाण्यात उडी घेतली . त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला व तो गंभीर जखमी झाला.
यावेळी त्याच्या साथीदारांनी प्रवाह बंद करून त्याला बाहेर काढले व उपचारासाठी धामोड येथे आणले मात्र त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुर सिपीआर रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. संबंधित घटनेची नोंद सिपीआर पोलीस चौकीत झाली आहे .विजेचा करंट व केमिकलचा वापर करून मासेमारीच्या प्रकारात वाढ झाली असुन यावर कोणाचेही निर्बंध नाहीत . अशा प्रकारांवर वेळीच आळा घालण्याची मागणी परिसरातुन होत आहे .
हळद लागलीच नाही
मासेमारी करताना विजेचा शॉक बसुन मृत्युमुखी पडलेला युवक अभिजित हळदे याचा विवाह ठरला होता. अवघ्या चार दिवसावर सोहळा येवुन ठेपला असतानाच अभिजितचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.