दहावीच्या निकालापूर्वीच काळाने गाठले : दुर्दैवी घटनेने गावस कुटुंबियांसह गावावर दु:खाचा डोंगर
वाळपई : केरी येथील वाळवंटी नदीच्या कळसकोंड येथील नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू होण्याची घटना घडली. दीपेश नामदेव गावस(वय 16) असे त्याचे नाव आहे. या दुर्देवी घटनेने त्याच्या कुटुबियांवर दु:खाच डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दीपेश गावस हा आपल्या नातेवाईकांच्या सोबत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या वाळवंटी नदीपात्रातील ‘कळस कोंड’ येथे आघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत बहीण, भाऊ व इतर नातेवाईक होते. पाण्यात बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान, दीपेश बुडाल्याचे वृत्त समजताच गावातील नागरिकांनी नदी परिसरात धाव घेतली व काही जणांनी पाण्यात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. त्यानंतर ताबडतोब 108 रुग्णवाहिका आणून त्याला सांखळी सरकारी ऊग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. त्यावर सोमवारी शवचिकित्सा करून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात देईल. दीपेश याच्या पश्चात आईवडील, एक भाऊ एक बहीण, आजी आजोबा असा परिवार आहे.
दहावीच्या निकालापूर्वीच मृत्युने गाठले
दीपेश याने केरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातून नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. पुढील काही दिवसांत निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घालून कुटुंबियांचा आनंदही हिरावून घेतला. दीपेशचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. याबाबत गावातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात आहे. दीपेश हा मनमिळावू आणि सोज्वळ स्वभावाचा असल्याने त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. मात्र तो अचानक दुर्दैवीपणे कायमचा सोडून गेल्याने कुटुंबियासह मित्रांनी मोठा आक्रोश केला. शाळा व्यवस्थापनाने दीपेशच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.
कळसकोंड आंघोळीसाठी धोकादायक.
वाळवंटी नदी पात्रातील कळसकोंड हे ठिकाण आंघोळीसाठी काही प्रमाणात धोकादायक आहे. चांगले पोहता येत नसेलतर त्याठिकाणी आंघोळीसाठी जाणे जीवावर बेतू शकते. हे दीपेशच्या बुडून झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याठिकाणी लोकांनी आंघोळीसाठी जाताना विशेष खबरदारी घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.